ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठी खास करून उत्तर प्रदेशातील अपयश झाकण्यासाठीच मोदी विरुद्ध योगी असे चित्रं जाणूनबुजून निर्माण केले जात आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले, काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत. परंतु, कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती आहे.
कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
- लसीकरण किती झाले हे का लपवायचे ?

केंद्र सरकार कोरोना लसीकरणाबाबतचा माहितीचा डाटा सार्वजनिक करु नका असे राज्यांना सांगत आहे मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे हे लोकांपासून का लपवायचे? असा सवाल नवाब मलिक यांनी केंद्राला केला आहे.
लसींच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यांमध्ये लसीकरण थांबले होते. दरम्यान, केंद्राने लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारकडून काढून घेत स्वतःकडे घेतली. यानंतर केंद्राने लसीकरणाची आकडेवारी जाहीर करू नका असा आदेश दिला. या आदेशावरून नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.