बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते गावांतील विद्यार्थ्यांचे हाल : पास असूनही घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनपासून बंद असलेली काही गावची बससेवा अद्यापही बंदच आहे. काही गावांना अपुऱया व अनियमित बससेवेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अतिवाड गावची बसदेखील अनियमित झाल्याने अतिवाडसह बेकिनकेरे, बसुर्ते या तिन्ही गावचे प्रवासी, विद्यार्थी व कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नऊ महिन्यांतर शाळा-महाविद्यालये सुरू झाली. मात्र, विद्यार्थ्यांची अपुऱया बससेवेमुळे गैरसोय होताना दिसत आहे. परिणामी या भागातील विद्यार्थ्यांना बसपास असूनदेखील खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शाळा-
कॉलेजना वेळेत पोहोचणे मुश्कील झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नियमित व सुरळीत बससेवा सुरू करावी, या मागणीसाठी कित्येक वेळा परिवहन महामंडळाकडे निवेदन सादर करूनही परिवहन महामंडळाने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. बससेवा सुरळीत नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
उचगाव-कोवाड या मुख्य रस्त्यापासून बसुर्ते गाव दोन किलोमीटरवर आहे. मात्र, गावाला स्वतंत्र बससेवा नाही. त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, कामगारवर्गाला पायपीट करावी लागते. प्रवाशांना मुख्य रस्त्यावर येऊन बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, याकडे परिवहन मंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र, या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची फरफट थांबविण्यासाठी पुरेशी व नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
तीन गावांसाठी एकच बस
बेकिनकेरे, अतिवाड व बसुर्ते या तीन गावांसाठी परिवहन मंडळाची एकच बस आहे. यामुळे तिन्ही गावांतील विद्यार्थी एकाच बसवर अवलंबून आहेत. अतिवाड गावातील विद्यार्थ्यांना एखाद्या वेळी बस चुकल्यास दुसरी कोणतीच वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे अडीच ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र बससेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांना बसपास असूनही खासगी वाहनांतूनच ये-जा करावी लागत आहे. पूर्वी ही बस दिवसभरात पाच फेऱया मारत होती. मात्र, आता दोन-तीनच फेऱया होत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिन्ही गावच्या प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन परिवहन मंडळाने बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.