‘असतील शिते तर जमतील भुते’ ही म्हण सर्वश्रुत आहे. स्वार्थासाठी लोक श्रीमंतांच्या अवतीभवती घोटाळतात. त्यांची खुशामत करतात. त्यांच्यात नसलेले गुण चिकटवून त्यांची वारेमाप प्रशंसा करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला समाजात मोठी प्रति÷ा मिळते, मानसन्मान मिळतो. त्यामुळे तोही जमिनीपासून दोन अंगुळे वर चालू लागतो. डोक्मयात हवा शिरते. ‘पैसा फेक, तमाशा देख’ नुसार तोही लोकांवर पैशाच्या जोरावर आपला प्रभाव पाडतो, त्यांना जणू आपले गुलाम बनवतो. ही श्रीमंती बऱयाच वेळा अवैध मार्गाने आलेली असते. त्यामुळे त्याबरोबर येणारे दोष, उन्मत्तपणा, घमेंड, गर्व इ. सारे दुर्गुण आपोआप येतात. तसेच सत्ताही मिळवता येते. सत्ता आली की, मत्ताही आपोआपच येते हे आपण व्यवहारातही पाहतोच. पण ही पैशाची मिजास म्हणजे ‘चार दिनों की चाँदनी’ असते. कारण मुळातच लक्ष्मी चंचल असते. ती जशी येते, तशी पट्कन कधी निघून जाईल सांगता येत नाही. ती एकदा निघून गेली की, आप्तस्वकीय, मित्र, नातेवाईक सारे दूर निघून जातात. हाच आशय सांगणारी अनेक संस्कृत सुभाषिते आहेत.
त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं, पुत्राश्च दाराश्च सुह्रज्जनाश्च।
तमर्थवन्तं पुनराश्रयन्ति,अर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः।।
अर्थ-धन नसलेल्या माणसाला त्याची मुले, पत्नी, जवळची माणसे सारी सोडून जातात. तो श्रीमंत झाल्यावर सारे पुन्हा त्याचा आश्रय घेतात. म्हणूनच धन, संपत्ती हाच जगात माणसाचा बंधू आहे! लक्ष्मी चंचल असते, ती जशी अचानक येते तशी अचानक जातेही. हे सांगणारा हा श्लोक पहा!
आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ, लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम्। एतान्प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचपे, रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः।। अर्थ- संपत्तीमुळे आंधळा झालेल्या हे मूर्खा, तू संकटात सापडलेल्याला का बरे हसतोस? लक्ष्मी कधीही स्थिर नसते, यात विशेष ते काय? ह्या रहाटगाडग्याच्या घटांकडे पाहतोस ना? जे रिकामे आहेत ते (पाण्याने) भरून येतात आणि भरलेले रिकामे होतात! संपत्तीने उन्मत्त झालेल्या लोकांकडे विचार, विवेक ह्या गोष्टी नसतात. अविवेक, अविचार हा अनेक संकटांना आमंत्रण देणारा असतो. विचाराने, विवेकाने वागणाऱयाला गुणांवर भाळणारी लक्ष्मी स्वतःहून पसंत करते. तीच लक्ष्मी दीर्घकाळ टिकणारी असते. अशा अर्थाचा हा श्लोक.
सहसा विदधित न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम्।
वृणुते हि विमृश्यकारिणं गुणलुब्धा स्वयमेव संपदा।।
सारांश, संपत्ती प्रामाणिकपणे, स्वतःच्या पराक्रमावर मिळवावी, दुसऱयाची फसवणूक करून, लबाडीने मिळवू नये. तुमच्याकडे सद्गुण असतील, तर संपत्ती आपोआप चालत येईल.