मानवळेच्या आरोही भोसलेचे साहस
प्रतिनिधी / पिंपळगाव (कोल्हापूर)
दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती चिमुकली मंडळी बनवत असतात. अगदी गडाची तटबंदी, बुरुज, गडाची बारीकसारीक सजावट, बारकावे, शिवप्रतिमा यांची मांडणी करत नाशिक जिल्ह्यातील हरिहरगडाची प्रतिकृती साकारत असतानाच हाच गड सर करण्याची इच्छा व्यक्त करत, प्रचंड उंचीचा, काताळ पायऱ्यांमध्ये कोरलेला, अगदी मोठ्या मुलांनाही घाबरवून सोडणारा हा हरिहर किल्ला प्रत्यक्षात अनवाणी चढून सर करण्याची किमया भुदरगड तालुक्यातील मानवळे येथील आरोही विक्रम भोसले या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीने केली आणि मुलांमुलींच्या मनामध्ये गडकिल्ल्यांविषयी प्रेम व प्रेरणा निर्माण केलीय. तिच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील हरिहरगड ओळखला जातो, तो तेथील पायऱ्यांमुळे. त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात. भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही, राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र अविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील अगदी तसाच प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो.
आरोही भोसले ही अवघ्या पाच वर्षाची असून ती नवी मुंबईतील घणसोलीच्या ज्युनिअर केजीमध्ये शिकते. सध्या कोरोनामुळे ती आईवडिलांसह आपल्या मानवळे या गावी राहत आहे. तिचे वडील विक्रम भोसले यांना गडभ्रमंतीची आवड असल्याने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षापासून आरोहीसुद्धा गडाची भ्रमंती करत आहे. आतापर्यंत तिने राजगड, रायगड, तोरणगड, प्रतापगड, सज्जनगड अजिंक्यतारा, पन्हाळगड, भुदरगड हे किल्ले चालत सर केले आहेत. दिवाळीमध्ये हरिहर गडाची प्रतिकृती तयार करत तिने वारंवार हरिहर गडावर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने तिच्या वडिलांनी तिला हरिहर गडावर नेऊन तिची इच्छा पूर्ण केली. तिने अगदी न थकता अनवाणी पायाने प्रचंड उंचीच्या गडाच्या काताळ पायऱ्या चढून गड सर केला. तिच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– आरोही भोसले
मला या काताळ पायऱ्यात कोरलेल्या उंच अशा हरिहरगडाचे मोबाईलवर वारंवार फोटो पहावयास मिळत असल्याने या गडाविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे मी वडिलांकडे या गडावर चढण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा वडिलांनी तेथे नेऊन प्रत्यक्षात पूर्ण केली. प्रचंड उंचीच्या या गडावरील काटाळपायऱ्यावरून वर चढून जाताना मनाध्ये जराही भीती वाटली नाही.