नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संकटामुळे बंद पडलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. 27 मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांना प्रारंभ करण्यात येईल, अशी घोषणा नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मंगळवारी केली. त्यामुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळात मर्यादित आणि आवश्यकतेपुरत्या विमान सेवांची (बबल अरेंजमेंट) व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था 26 मार्चपासून थांबविण्यात येणार आहे. 27 मार्चपासून पुन्हा पूर्वीसारखी आंतरराष्ट्रीय विमानसेवा हाती घेण्यात येईल. त्यामुळे भारतातून विदेशात आणि विदेशातून भारतात मुक्तपणे जाण्यायेण्याची सोय होईल. यामुळे पर्यटन आणि उद्योग-व्यवसाय यांना प्रोत्साहन मिळेल. मात्र युक्रेन युद्धामुळे विमान इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे युद्ध थांबून तेलदर पूर्ववत होईपर्यंत विमान प्रवास महाग असण्याची शक्यता आहे.
भारतात आणि जगभरात कोरोना संसर्ग आता आटोक्यात आला आहे. त्यामुळे सर्व संबंधितांशी चर्चा करुन केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्व प्रवासी आणि विमानसेवांचे व्यवस्थापन यांना कोरोना नियमांचे, तसेच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे लागेल. या नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदलही पाळावे लागतील. आरोग्य आणि कौटुंबिक आरोग्याची नियमावली कसोशीने पाळावी लागणार आहे, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
दीर्घ पल्ल्याच्या सेवा
भारत ते अमेरिका थेट विमानसेवा, भारत ते जर्मनी किंवा युरोपातील महत्वाच्या देशांसाठी थेट विमान सेवा आदी दीर्घ पल्ल्याच्या विमानसेवा सुरु करण्यावर सरकार विचार करीत आहे. त्या लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी सरकारची इच्छा असली तरी महत्वाची समस्या इंधनाच्या दराची आणि त्यामुळे होणाऱया विमान भाडय़ाच्या वाढीची आहे, असेही ज्योतिरादित्य सिंदिया यांनी स्पष्ट केले.