प्रतिनिधी/ चिपळूण
नारळाच्या झाडाला खोडामध्ये टॉनिकचे इंजेक्शन दिल्यावर त्यावर नारळ लवकर आणि तेही भरपूर लागतात असे सांगत आंध्रप्रदेशमधून आलेल्या चौघांनी तालुक्यातील शेतकऱयांकडून प्रत्येकी चार-ते सहा हजार रूपये उकळले. खेर्डीत हा प्रकार काही चाणाक्ष शेतकऱयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना पकडून पंचायत समिती आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर कुणाचीही तक्रार नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आले.
खेर्डीमध्ये सोमवारी आंध्रप्रदेशमधून आलेल्या चौघांनी शेतकऱयांच्या दारात जाऊन नारळाला टॉनिकचे इंजेक्शन दिल्यास त्यावर फळधारणा चांगली आणि लवकरच येते असे सांगीतले. त्यासाठी प्रत्येक नारळामागे दर सांगून चार ते सहा हजार रूपये घेण्यास सुरूवात केली. काही चाणाक्ष नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील कृषी विभाग तसेच कृषी उत्पादने विक्री करणाऱया येथील केंद्राकडे विचारणा केली असता हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून त्याना पंचायत समितीत घेऊन येण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या चौघांपैकी एक जणाला शेतकरी, ग्रामस्थांनी पकडून चांगलाच ‘प्रसाद’ दिला.
याचवेळी पंचायत समितीमध्ये सभापती धनश्री शिंदे, उपसभापती पांडूरंग माळी, पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे, शरद शिगवण यांच्यासह शेतकरी उपस्थित असतानाच सबंधिताला घेऊन शेतकरी आले. यावेळी विचारणा केली असता त्याने आपणासहीत चौघेजन आध्रप्रदेशमधून कोल्हापूर आणि तेथून मोटरसायकलने येथे आलो आहोत. गावागावातून फिरत आपण नारळ झाडाला टॉनिगचे इंजेक्शन आणि फवारणी करत असल्याचे कबूल केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारीही दाखल झाले. त्यानीही त्यांच्याकडे परवानगीची मागणी केली असता अशी कोणतीही परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. यातच दोघा शेतकऱयांचे घेतलेले पैसेही परत करण्यात आले.
दरम्यान यानंतर पोलिसांकडे संपर्क साधल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे सहकाऱयांसह दाखल झाले. त्यांची चौकशी करून अन्य तिघांनाही पोलीस स्थानकात येण्यास सांगितले. दरम्यान सायंकाळी पोलीस स्थानकात याबाबत विचारणा केली असता कुठल्याही शेतकऱयाने तक्रार न दिल्याने समज देऊन सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.