प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात शिमगोत्सव मोठय़ा उत्साहात सुरू झाला असून कोरोना नियमांचे पालन करून अनेक गावांमधून आजपासून तेरसे शिमग्याला प्रारंभ होणार आहे. भद्रेचे शिमगे रविवार 28 मार्चपासून साजरे होणार आहेत. शहराच्या आसपासच्या गावांतील काही निवडक पालख्या रत्नागिरीतील बारावाडय़ांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरीला भेटावयास येत आहेत. त्यावेळी उत्साही वातावरण असले तरी दरवर्षीचा डामडौल मात्र कोरोना नियमावलीमुळे विरला आहे.
कोकणातील प्रमुख दोन सणांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागल्या आहेत. जिल्ह्य़ात 1 हजार 377 पालख्या धुलीवंदनापर्यंत भक्तांच्या भेटीला येणार असून 1 हजार 167 ठिकाणी सार्वजनिक तर 3 हजार 79 खासगी होळय़ा उभारण्यात येणार आहेत. फाकपंचमीनंतर सुरु झालेला ग्रामदेवतांच्या पालख्यांची रुपे लावण्याचा कार्यक्रम काही गावांत अजूनही सुरू आहे. रुपे लावल्यानंतर पालख्या बाहेर पडतात. पण यावर्षी मिरवणूक सोहळय़ांवर कोरोना नियमावलीची बंधने आहेत.
जवळपासच्या गावातील अनेक पालख्या पायी तर काही पालख्या टेम्पो अथवा ट्रकमधून येतात. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, जयस्तंभपासून पालख्या श्री देव भैरी मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात पायी नेल्या जातात. शहरात विविध पालख्या येणार असल्यामुळे श्री भैरी देवस्थानतर्फे त्या बाबतचे नियोजन करण्यात येते. पण यावर्षी अनेक पालख्यांची रेलचेल रोडावल्याचे चित्र आहे.