प्रतिनिधी / कोल्हापूर
गवसे येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. आज शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला.
३१ मार्च २०२० अखेर या कारखान्याकडील बँकेची थकबाकी १०४ कोटी रुपये होती. या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट-२००२ नुसार हा कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर बँकेने बँकेसह, शेतकरी, कामगार, शासकीय देणी व इतर सर्व अशी २०७ कोटी रुपयांची देणी निश्चित केली. ही सर्व देणी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रमाणित झालेली आहेत. ही देणी भागविण्यासाठी कमीत कमी वर्ष चालविण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स या तत्त्वावर देण्याचा ठराव झाला. याबाबत बँकेच्या वतीने लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.