प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेनंतर उदासिनतेची छाया दूर करणारा निसर्गाचा आविष्कार सूर्यग्रहणाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे समस्येत अडकलेल्या मानवी जीवनाला 21 जून रोजी एका अनोख्या घटनेचा साक्षीदार होता येणार आहे. भारतात उत्तरेकडील भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतात हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल हा पुण्यकाल म्हणून अनुभवतील, असे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
हे ग्रहण दिवसाच्या दुसऱया प्रहरात होत असल्याने शनिवारी 20 जूनच्या रात्री 10 पासून ग्रहणाचे वेध लागले आहेत. 21 जून रोजी ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच दुपारी 1 वाजून 28 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावे लागणार आहेत. सकाळी 10 वाजून 04 मिनिटांनी ग्रहणस्पर्श होणार आहे. तर 11 वा. 39 मिनिटांनी ग्रहणाचा मध्य होणार आहे. दुपारी 1 वा. 28 मिनिटांनी ग्रहणाची समाप्ती होणार आहे. सूर्यग्रहणाच्या विविध अवस्था नाटय़मय स्वरुपात बेळगावकरांना अनुभवता येणार आहेत. ग्रहणाचा पर्वकाळ साधारण 3.27 तासांचा आहे, असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.
आविष्काराचे साक्षीदार
यापूर्वी 15 जानेवारी 2010 व 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण भारताच्या दक्षिणेकडील काहीच भागात दिसले होते. त्यानंतर रविवारी 21 जून 2020 रोजी सूर्यग्रहणाच्या आविष्काराचे साक्षीदार होता येणार आहे. यानंतर पुन्हा अनुभव 21 मे 2031 म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर मिळणार आहे. या दिवशी अमावास्या आणि ग्रहणकाळ असून यामुळे निसर्गाच्या कलाविष्कारातून रंगणारे नाटय़ पाहण्याचे साक्षीदार होता येणार आहे.
ग्रहणाचे वेध व पाळणूक
हे ग्रहण दिवसाच्या दुसऱया प्रहरात होत असल्याने शनिवारी रात्री 10 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बालक, वृद्ध, आजारी, अशक्त आणि गर्भवती स्त्रियांनी दि. 21 च्या पहाटे 4.45 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात भोजन करू नये. स्नान, जप, नित्य कर्म, देवपूजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमुत्रोत्सर्ग, झोप आदी कर्मे करता येतात. मात्र, ग्रहणकाळात म्हणजेच सकाळी 10 वा. 04 पासून ते दुपारी 1.28 पर्यंत पाणी पिणे, मलमुत्रोत्सर्ग आणि झोपणे ही कर्मे करू नयेत, असे पंचांग सांगते.
उघडय़ा डोळय़ांनी ग्रहण पाहू नये
कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याकरिता तयार केलेले विशेष चष्मे किंवा काजळी लावलेली काळी काच किंवा किरण डोळय़ापर्यंत पोहचू नयेत यासाठी वापरावयाच्या साधनांचा वापर करूनच ग्रहण पाहावे. कोणत्याही कारणास्तव या काळात उघडय़ा डोळय़ांनी सूर्याकडे पाहू नये. ग्रहणाचे फोटो दक्षता घेऊनच काढावेत, अन्यथा डोळय़ांना इजा पोहचू शकते.