ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. शुक्रवारी माजी कॅबिनेट मंत्री राजीव बॅनर्जी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पक्षप्रमुख ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली आहे. बॅनर्जी यांनी 22 जानेवारीला कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
मागील महिन्यात आमदार शुभेंदु अधिकारी, जितेंद्र तिवारी आणि शीलभद्र दत्त या आमदारांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
बंगालच्या 294 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकीपूर्वीच ममता सरकारच्या अडचणी वाढत आहेत. पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करत आहेत. सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेते कनिष्क पांडा यांचीही काहीदिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चार आमदारांसह काही नेत्यांनी पक्ष सोडल्याने तृणमूलमधील गळती रोखण्याचे ममतांसमोर मोठे आव्हान आहे.