नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या आणखी चार कंपन्या येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून कोरोना लसीचे उत्पादन करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेत दिली आहे. यामुळे देशव्यापी लसीकरण अभियानाला अधिक वेग प्राप्त होणार आहे. भारताचे ध्येय वर्षअखेरपर्यंत 120 कोटी लसीकरणाचे आहे.
राज्यसभेत प्रश्नोत्तर काळात मांडविया यांनी कोरोना लसीकरणाची माहिती दिली. आतापर्यंत देशात 47 कोटींहून अधिक लोकांना लसीचा किमान एक डोस मिळालेला आहे. संपूर्ण देशाचे लसीकरण लवकरात लवकर करण्याची सरकारची योजना आहे. खासगी रुग्णालयांकडे अद्यापही 7 ते 9 टक्के लसी विनाउपयोग पडून आहेत. त्यांचाही उपयोग सरकारी लसीकरण केंद्रांकडून केला जात आहे. लसीकरण अभियान सुरळीत सुरू आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये त्याचा वेग आणखी मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आणखी दोन लसी उपलब्ध होणार
देशात लवकरच आणखी दोन लसी उपलब्ध होणार आहेत. बॉयोलॉजिकल्स ई आणि नोव्हार्टिस या लसी लवकरच भारतीय बाजारांमध्ये थडकतील. सध्या भारत बायोटेक आणि सिरम या दोन कंपन्या लसींचे उत्पादन करीत आहेत. केंद्र सरकार यग्न कंपन्यांकडून लसी विकत घेऊन त्यांचे देशभरात वाटप करीत आहे. स्पुटनिक व्ही या रशियन लसीचे उत्पादन भारतात सुरु झाले आहे.
खासगी लसींमध्ये कपात
केंद्र सरकारने खासगी लसीकरण केंद्रांना दिल्या जाणाऱया लसींच्या वाटय़ामध्ये कपात केली आहे. अनेक खासगी केंद्रांमध्ये लसी पडून राहण्याचे प्रमाण मोठे होते. परिणामी, लसी अधिक प्रमाणात वाया जात होत्या. ही हानी टाळण्यासाठी केंद्र सरकारने खासगी वाटा कमी केला, अशी माहिती मांडविया यांनी दिली.