केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारा
नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण देशात कोरोनाबाधित होत आहेत. अशातच केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ही लाट अत्यंत भयंकर असून आता देशात घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे देशातील कोरोना परस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोना आणि लसीकरणाबात लोकांच्या मनातील काही शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न आज केंद्र सरकारने केला. कित्येक लोक भीतीने रुग्णालयात दाखल होत आहेत, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच रुग्णालयात दाखल झाले पाहिजे, असे आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच देशात ऑक्सिजन उपलब्ध आहे. मात्र, तो रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान आहे. रुग्णालयांनी गरजेनुसार रुग्णांना ऑक्सिजनचा वापर करावा. तसेच रेमडेसिवीर आणि टोसिलिजुमाब यासारखी औषधेही गरजेनुसार द्यावीत, असे अगरवाल यांनी सांगितले.
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर गरोदर महिलांनी कोरोना लस घेऊ नये, अशा आशयाच्या अफवा होत्या. यावरही केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. गरोदर महिलांना कोरोना लस घेण्यात काहीही अडचण नाही. त्या कोरोनाची लस घेऊ शकतात. तसेच देशात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.