ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने : तज्ञांच्या बैठकीत निर्णय : मुख्यमंत्र्यांची माहिती
- सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग 100 टक्के हजेरीसह भरणार
- कोविड मार्गसूचीचे पालन करून 3 तारखेपासून पबही सुरू
- नाईट कर्फ्यूच्या वेळेत झाली एक तास कपात
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आला असला तरी रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत नाईट कर्फ्यू लागू होता. मागील मार्गसूचीची मुदत 25 सप्टेंबर रोजी सकाळी संपणार आहे. त्यामुळे आज शनिवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू कालावधीत एक तासाने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून दररोज रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे. यासंबंधीची अधिकृत मार्गसूची शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. ही मार्गसूची 11 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 6 पर्यंत लागू असणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून 1 ऑक्टोबरपासून निर्बंध आणखी शिथिल केले जाणार आहेत. शुक्रवारी कोरोना स्थितीसंबंधी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1 टक्क्यापेक्षा कमी असणाऱया जिल्हय़ांमध्ये चित्रपटगृहे 100 टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही अटींवर 3 ऑक्टोबरपासून पब देखील सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग 100 टक्के क्षमतेने भरविण्यास परवानगी देण्यात आली असून यासंबंधीची अधिकृत मार्गसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी राज्यातील कोरोना स्थितीसंदर्भात तज्ञांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्हिटी दर सरासरी 0.66 टक्के आहे. 1 ऑक्टोबरपासून कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1 टक्क्यापेक्षा कमी असणाऱया जिल्हय़ांमधील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, रंगमंदिर, ऑडिटोरियम 100 टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यात येतील, जर पॉझिटिव्हिटी दर 1 टक्क्यापेक्षा अधिक असेल तर तेथे चित्रपटगृहे 50 टक्के आसनक्षमतेने सुरू ठेवता येईल. आणि पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांवर गेल्यास चित्रपटगृहे बंद करण्यात येतील. हेच निकष पबसाठी देखील लागू केले जाणार आहेत, असे ते म्हणाले.
कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश द्यावा, गर्भवती आणि लहान मुलांना प्रवेश न देण्याचा निर्णयही तज्ञांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दसरा सणासाठी स्वतंत्र नियमावली लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. राज्याच्या सीमेवरही करडी नजर ठेवण्यात येत असून यादगीर, रायचूर, गुलबर्गा आणि म्हैसूर जिल्हय़ांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतिमान करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांबाबत निर्णय नाही
राज्यातील सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्यात येत असले तरी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये दररोज 50 टक्के हजेरीला मुभा आहे. 1 ऑक्टोबरपासून सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग 100 टक्के क्षमतेने आठवडय़ातून पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दिवशी भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दसरा सुटीपर्यंत पाचवीपर्यंतचे वर्ग भरणार नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालयांमध्ये शनिवारी आणि रविवारी सॅनिटायझिंग करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.