पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद, 1.25 कोटी रोजगार उत्तर प्रदेशात निर्माण करण्याचे योजनेचे ध्येय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेतून स्थानिक उद्योजकतेला उत्तेजन दिले जाणार आहे. तसेच स्थानिक उद्योजकांची भागीदारी आदौगिक संघटनांशी करून जास्तीत जास्त संख्येने रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या योजनेचा प्रारंभ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यातील सहा जिल्हय़ांमधील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…
ही योजना कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले लक्षावधी कामगार कोरोनामुळे उत्तर प्रदेशात परतले आहेत. त्यांना राज्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना आहे. ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच या नव्या योजनेच्या माध्यमातूनही त्यांचा व इतर बेरोजगारांचा लाभ करून देण्याची योजना आहे.
आयात कमी करण्याचे धोरण
आवश्यक उत्पादनांची आयात शक्य तितकी कमी करण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून त्यानुसार स्थानिक उद्योजकतेला वाव दिला जाईल. परदेशातून आयात केली जाणारी पुष्कळशी उत्पादने भारतात तयार होऊ शकतात. त्यासाठी थोडा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक तंत्रज्ञान विकासालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे देशातला पैसा देशातच राहून प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील अशी संभावना असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांशी संवाद
पंतप्रधान मोदी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील परिस्थिती समजून घेतली. तसेच अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या कल्पकतेने नवनवे व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच इतरांना रोजगार मिळवून दिला आहे. अशा स्वयंप्राज्ञ उद्योजकांचे कौतुक करून काही सूचना त्यांनी केल्या.
स्थिती कथन केली
कोरोनामुळे देशावर तसेच जगावर आलेल्या अभूतपूर्व संकटात अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारतात त्या मानाने स्थिती बरी आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स आदी महासत्तांची मिळून लोकसंख्या उत्तर प्रदेश एवढीच आहे. मात्र या देशांमध्ये कोरोना मृत्यूंची संख्या सव्वा लाखांहूनही अधिक आहे. तर उत्तर प्रदेशात ती 600 च्या आसपास आहे. अमेरिकेसारख्या बलाढय़ देशालाही कोरोनाने संकटात टाकले आहे. तुलनेने भारतात असलेल्या चांगल्या स्थितीचे श्रेय येथील जनतेला जाते, असेही मोदींनी स्पष्ट केले. अचानक ओढवलेल्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी तसेच अनोखे मार्ग अवलंबावे लागणार आहेत. आत्मनिर्भर झाल्याखेरीज आपल्याला आता तरणोपाय नाही, असे प्रतिपादन मोदींनी केले.