रस्त्यावर धुळीचे साम्राज्य : ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत असून आनंदनगर ते अनगोळपर्यंतच्या संपर्क रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्याचे काम अर्धवट असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत वडगाव-अनगोळ संपर्क रस्त्याचे रूंदीकरण आणि विकास करण्यात येत आहे. याकरिता येथील रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी परिसरातील काही इमारती आणि अतिक्रमण हटविण्यात आली होती. काही ठिकाणांची अतिक्रमणे अद्याप हटविण्यात आली नाहीत. तसेच रस्त्याचे कामदेखील रखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याशेजारी खडी पसरली आहे. पण रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. परिसरातील पथदीप वारंवार बंद रहात असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पण सध्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी वाहनधारकांना अणि स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडगावहून अनगोळला जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे सर्रास वाहनधारक या रस्त्याचा अवलंब करीत असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्ता खराब झाला असल्याने धुळीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांचे डोळे धुळीने माखत आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहनांचे लहान मोठे अपघात होत आहेत. उत्स्फूर्तपणे काम सुरू करून महिन्यात रस्ता करण्याचे नागरिकांना सांगण्यात आले होते. पण सहा महिने होत आले तरी रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.