हलगा-मच्छे बायपासमधील महिला शेतकऱयांनी मांडल्या जिल्हाधिकाऱयांसमोर व्यथा
प्रतिनिधी/ बेळगाव
आमची ही जमीन सुपीक आहे. या जमिनीमधून कोणतेही पीक आम्ही घेऊ शकतो. तेव्हा अशा जमिनीतून डांबरी रस्ता करणे योग्य नाही. जर आमची जमीन घेऊन रस्ता केला तर नक्कीच तुम्हाला पाप लागेल, अशी भावनिक प्रतिक्रिया एका महिलेने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमोर मांडली. हातात जमिनीतील घेतलेले पीक घेऊन तिने ही व्यथा मांडली आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या परिसराची पाहणी केली. मच्छे ते अलारवाड क्रॉसपर्यंत पायी चालत त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बहुसंख्य शेतकऱयांनी साहेब आमच्या पोटाचा विचार करा, आमच्या मुलांचा विचार करा आणि रस्ता थांबवा, अशीच व्यथा मांडली.
13 कि.मी. रस्ता पायी चालून केली पाहणी
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बहुसंख्य शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. सकाळी 7.30 वाजताच जिल्हाधिकारी येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी 13 कि.मी. रस्ता पायी चालून पाहणी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दमदार पिके त्यांच्या नजरेस पडली. यावेळी शेतकरी त्यांना या जमिनीतून केवळ हवेवर आलेला जोंधळा, मसूर, वाटाणा, मोहरी, काकडी, टरबूज तसेच भाजीपाला आणि ऊस दाखविला. काळीभोर धरणीमाता पहा, आम्हाला किती उत्पन्न देते, असे सांगून काहीही करा हा रस्ता थांबवा, अशीच गाऱहाणी प्रत्येक शेतकऱयाने मांडली.
समाधानाने जीवन जगायला द्या
जिल्हाधिकाऱयांनी ही सर्व पिकांची पाहणी केली. रस्त्याचा परिसर निसर्गरम्य असल्याचे त्यांनाही जाणवले. मात्र, आता जिल्हाधिकारी सरकारकडे कशा प्रकारे पाठपुरावा करणार याचीच प्रतीक्षा शेतकऱयांना लागली आहे. हलगा ते मच्छे बायपास हा रस्ता अत्यंत सुपीक जमिनीतून होत आहे, हे साऱयांनाच माहिती आहे. तेव्हा तुम्हीही आता स्वतः पाहणी केली आहे. आता तरी हा रस्ता रद्द करा आणि आम्हाला समाधानाने जीवन जगायला द्या, अशी मागणी शेतकऱयांनी यावेळी केली.
यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, जयश्री गुरवण्णावर, प्रकाश नाईक, राजू मरवे, तानाजी हलगेकर, रमाकांत बाळेकुंद्री यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आपल्या कुटुंबासह शेतकरी जिल्हाधिकाऱयांसमोर गाऱहाणे मांडताना दिसत होते. आम्ही रक्कम घेतली नाही आणि घेणारही नाही. याचबरोबर आम्हाला कोणतीही आमिषे दाखवू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करा
जिल्हाधिकाऱयांनी पाहणी केली हे बरोबर आहे. मात्र पाहणी करून न थांबता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी किर्तीकुमार कुलकर्णी यांनी केली आहे. कारण पाहणी करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये योग्य माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.