मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत : उगाच पर्यारणाचा बाऊ कुणीही करु नये : नकारात्मक भावना सरकार खपवून घेणार नाही
वाळपई / उदय सावंत.
सुमारे साडेतीन हजार कोटी खर्चून गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पासंदर्भात आतापर्यंत नकारात्मक घटना होताना दिसत आहेत. एका बाजूने आपण विकासावर विचार करतो तर दुसऱया बाजूने पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला खो घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. आयआयटी प्रकल्पाच्या संदर्भात नागरिकांमध्ये असलेली नकारात्मक भावना ही निरर्थक आहे. हा प्रकल्प आल्यास खऱया अर्थाने गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गुळेली गावाचे नाव जागतिक नकाशावर कोरले जाणार आहे. प्रकल्पाला विरोध करण्याऐवजी त्याच्यासंदर्भात असलेली सकारात्मकता जाणून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
नागरिकांनी सतर्क राहून राजकीय स्वरूपाच्या भुलभुलय्याला बळी न पडता स्वतःच्या व आपल्या भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा विध्वंस होणार नाही. या गावाच्या विकासाला खऱया अर्थाने चालना प्राप्त होणार आहे. काही राजकीय व स्वतःचा स्वार्थ साधणारी मंडळी या प्रकल्पाच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशा व्यक्तींपासून स्थानिकांनी सतर्क होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्याची चांगली संधी स्थानिक गमावून बसणार आहेत.
सरकारचा हा स्वप्नवत असा प्रकल्प
या प्रकल्पाच्या माध्यमातून गुळेली व संबंधित गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मदत प्राप्त होणार आहे. हा प्रकल्प म्हणजे गावाच्या विकासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून आतापासून बेरोजगारीच्या गराडय़ात सापडलेली या भागातील नागरिक मंडळींना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होणार आहे. सरकारचा हा स्वप्नवत असा प्रकल्प असून सत्तरी तालुक्मयातील जनतेने या प्रकल्पाच्या संदर्भात पाठबळ देऊन स्वतःच्या विकासाला स्वतः चालना देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायतीला महसूल प्राप्त होणार
या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात पंचायतीला महसूल प्राप्त होणार असून यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळय़ा स्वरूपाच्या मूलभूत विकासाला प्राधान्य प्राप्त होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातही क्रांती होणार आहे. सभोवताली भागांमध्ये शैक्षणिक संकुल उभारल्याने शिक्षणाला चालना प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून छोटय़ा-मोठय़ा उद्योगांना चांगल्या प्रकारची संधी प्राप्त होणार असून त्याचे थेट फायदे पंचायतीला प्राप्त होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
समस्यांची नागरिकांनी चिंता करु नये
कोणताही व कसलाही प्रकल्प आला तर समस्या निर्माण होणारच. मात्र हा प्रकल्प पूर्णपणे शैक्षणिक स्वरूपाचा आहे. यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या काही शुल्लक समस्या निर्माण होणार आहेत त्याची चिंता स्थानिकांनी व राजकीय पक्षांनी करणे गरजेचे नाही. त्यासाठी सरकार सक्षम आहे. काही विरोधक या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचा शोध लावतात. मात्र ही हास्यास्पद गोष्ट आहे. म्हादई नदीच्या पात्रात मुबलक स्वरूपाच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. गांजे याठिकाणी शंभर कोटी खर्चून धरण बांधण्यात येत आहे. त्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होणार आहे. हा पाण्याचासाठा या प्रकल्पाला व या प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱया नागरिकांच्या वापरासाठी केल्यास गावातील पिण्याच्या पाण्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नाही.
नकारात्मक भावना सरकार खपवून घेणार नाही
पर्यावरणाची चिंता राजकीय पक्षांनी करण्याची गरज नाही. या प्रकल्पासाठी ज्याकाही अवघ्याच नागरिकांच्या जमिनी जाणार असल्याचा प्रचार करण्यात येत आहे तो वस्तुस्थितीला धरून नाही. कारण सदर जमीन पूर्णपणे सरकारच्या मालकीची आहे. ज्या नागरिकांनी सदर जमिनीत काही ठिकाणी लागवड करण्यात आली आहे, त्यांना वेगळय़ा माध्यमातून सरकार लाभ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे. मात्र त्यांना आयआयटी प्रकल्पच नको अशा प्रकारची नकारात्मक सुराची भावना सरकार कदापि खपवून घेणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आयआयटी प्रकल्पासाठी जी जमीन निवडण्यात आलेली आहे ती 70 टक्के खडकाळ आहे. उगाचच पर्यावरणाच्या नावाखाली मोठा बाऊ करून या प्रकल्पाला आडकाठी आणली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.