मागण्या मान्य होईपर्यंत कामाला विरोध करण्याचा निर्णय
वाळपई / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या सीमांकन कामाला प्रारंभ झालेला आहे. दोन दिवस नागरिकांनी या कामाला पूर्णपणे विरोध केला होता. मात्र सरकारी यंत्रणेच्या कडक भूमिकेमुळे हे काम बंद झाले नाही. शुक्रवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावर उतरून या कामाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमांकन अधिकारी न पोहोचल्यामुळे शेवटी आंदोलन मागे घेण्यात आले. तरीही जनतेच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिलेला आहे.
गुरुवारी उपजिल्हाधिकाऱयाना निवेदन
दरम्यान सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना गुरुवारी प्रकल्पाच्या विरोधकांनी निवेदन सादर करून सीमांकन करण्याचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. मात्र याला उपजिल्हाधिकाऱयांनी नकार दिला होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भागाची जैवविविधता धोक्यात येणार असून यामुळे सदर काम बंद करून आयआयटी प्रकल्प येथून दुसरीकडे न्यावा, अशी मागणी केली होती.
शुक्रवारी नागरिक रस्त्यावर उतरले
प्रकल्पाच्या सीमांकन कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी शुक्रवारी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सकाळी नऊ वाजल्यापासून या भागातील आयआयटी विरोधक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. मुरमुणे धनगरवाडा येथील जागेवर सीमांकन करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी येणार असल्याची चाहूल लागताच त्यांनी रस्ता रोखून धरला होता. मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत कोणीही अधिकारी न आल्यामुळे शेवटी लोकांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
जनतेचे आयुष्य उधळून लावणारा प्रकल्प : मेळेकर
यावेळी पत्रकारांशी बोलताना स्थानिक तरुणी उन्नती मेळेकर यांनी सरकारच्या नावाने टीकास्त्र केले. या भागातील जनतेचे आयुष्य उधळून लावणारा हा प्रकल्प असून यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भाची माहिती सरकारला देऊनसुद्धा सरकार यासंदर्भात कोणत्याही प्रकारची गंभीरता दाखवित नाही. या सरकारला जनतेची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचा आरोप केला. जोपर्यंत हा प्रकल्प या भागातून हद्दपार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलेला आहे.
जनतेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा : मांदेकर
वाळपई काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांच्यावर टीका केली. यासर्व प्रकारांमध्ये विश्वजित राणे यांचा हात असून या भागातील जनतेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा त्यांनी उचलल्याचे दशरथ मांदेकर यांनी स्पष्ट केले आहे. हे आंदोलन उधळून लावण्यासाठी वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र हे प्रयत्न यशस्वी होणार नसून जोपर्यंत नागरिकांच्या एकजुटीची वज्रमूठ भक्कम आहे. तोपर्यंत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सफल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.