विद्यार्थ्यांची परीक्षेकडे पाठ : एससीव्हीटीचा सावळा गोंधळ : विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथील सरकारी आयटीआय कॉलेजमध्ये सोमवार दि. 14 पासून एससीव्हीटीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तब्बल चार वर्षांनी परीक्षा घेतल्या जात आहेत. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात परीक्षा घेण्यासाठी चार वर्षे लागल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. एससीव्हीटीच्या सावळय़ा गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अंधारात सापडले आहे.
2018-19, 2019-20, 2020-21 या शैक्षणिक वर्षांतील आयटीआयच्या परीक्षा एकाच वेळी सोमवारपासून होत आहेत. कोरोनामुळे मध्यंतरी परीक्षाच झाल्या नव्हत्या. परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर व्यवसाय, उद्योग सुरू केले आहेत. आता एक वर्ष खंड पडल्यानंतर पुन्हा परीक्षा जाहीर करण्यात आल्या. बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले असल्याने परीक्षेला केवळ 50 टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले. एससीव्हीटीच्या या भोंगळ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे.
दहावीनंतर तंत्रशिक्षण घेऊन लगेच नोकरी मिळेल या आशेने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आयटीआयचे शिक्षण घेतात. परंतु मागील काही वर्षात स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल टेनिंग (एससीव्हीटी) कडून परीक्षा घेतल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकांनी औद्योगिक कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वर्षभर खंड पडल्यानंतर आता परीक्षा कशा द्यायच्या, असा प्रश्न आयटीआय विद्यार्थ्यांसमोर आहे.
बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेची गरज…
कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होते. तसे पाहता आयटीआय हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून शिकावा लागतो, तरच कौशल्य प्राप्त होते. त्यातच ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्याने कसेबसे हे शिक्षण पार पडले. त्यामुळे निदान यावषीची प्रश्नपत्रिका बहुपर्यायी देणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत होती.