केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
वृत्तसंस्था/ जम्मू
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमान भारत अभियानातील सर्व लाभार्थींना सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या अभियानामध्ये सहभागी नसणाऱया रुग्णालयांमध्येही हे उपचार लाभार्थी घेऊ शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आयुष्यमानच्या यादीत नसणाऱया रुग्णालयांनाही आता कोरोना रुग्णावर उपचार करावे लागतील.
बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने याबाबतचा अध्यक्षादेश जारी केला आहे. तसेच याबाबतची नियमावली व कायदा अधिक कठोर केला आहे. कोणत्याही रुग्णालयाला आयुष्यमान भारत अभियानात सहभागी लाभार्थीवर उपचार करणे नाकारता येणार नाही. या महामारी दरम्यान, सर्वच रुग्णालयांनी मानवतेच्या दृष्टीने किमान उपचार करण्याची तयारी ठेवावी, असेही या आदेशात म्हटले आहे.