‘ग्रंथ आपल्या भेटीला’ व्याख्यानमालेचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
वाचनाने माझे आयुष्य समृद्ध केले, पराकोटीचा आनंद दिला. त्याबाबत बोलावे तेवढे कमीच आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक गरज म्हणून वाचनाकडे पाहिले पाहिजे, केवळ छंद म्हणून नाही. आज तंत्रज्ञान प्रचंड पुढारलेले आहे. अनेक प्रलोभने त्यातून उभी राहतात. पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या आहारी न जाता ग्रंथ वाचनाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असे कथा लेखिका प्राचार्या माधुरी शानभाग यांनी काढले.
राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘गंथ आपल्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमात त्या प्रमुख वक्त्या या नात्याने बोलत होत्या. पी. एन. पनीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राष्ट्रीय वाचन सप्ताहाचा उद्घाटन सोहळा आभासी माध्यमातून नुकताच झाला.
आपण वाचलेल्या अनेक पुस्तकांची उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगितली. मिळेल ते पुस्तक वाचून काढायचं अशी सुरुवात झालेला आपला वाचन प्रवास आता निवड करून ग्रंथ वाचनापर्यंत कसा आलेला आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. वाचनातून प्रत्येकाची घडण होत असते. त्यातूनच आपल्यामधील कथा लेखिका कशी घडली हे उलगडताना त्यांनी राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील अनेक अनमोल गंथ खजिन्याचा उल्लेख केला.
वाचनाचे फायदे अनेक असतात. स्वतःच्या सर्व बौद्धिक सामर्थ्यांना अबाधित ठेवण्यात तर त्याचे महत्त्व खूपच मोठे असते. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना या साधनाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने आरपीडी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने राष्ट्रीय वाचन सप्ताहानिमित्त ऑनलाईन ‘ग्रंथ आपल्या भेटीला’ या व्याख्यानमालिकेचे आयोजन केलेले आहे. त्याचे पहिले पुष्प माधुरी शानभाग यांनी गुंफले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी प्रस्तुत उपक्रमाचे स्वरुप स्पष्ट केले. तसेच माधुरी शानभाग यांचा परिचय करून दिला. प्रस्तुत कार्यक्रम गुगल मीटच्या आभासी माध्यमातून झाला. प्रा. परसू गावडे यांनी आभार मानले.