आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय
प्रतिनिधी / सातारा
आसलेच्या ओमकार चव्हाण याचे अपहरण करुन कृष्णा नदीच्या तिरावर नेवून त्याला लाकडी दांडक्यान मारहाण करुन खून केल्याप्रकरणी यापूर्वीच एलसीबीने चार जणांना अटक केली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली आहे. त्या अटक संशयितांमध्ये अक्षय संजीव जाधव (वय 21), बंटी शामराव मोरे (वय 32), वरुण समरसिंग जाधव(वय 23, रा. भुईंज) अशी नावे असून त्या प्रकरणात आणखी काही युवकांचा समावेश असून पोलीस तपास घेत आहेत.
भुईज गावच्या हद्दीत दि. 4 रोजी कृष्णा नदींच्या पात्रात ओमकार चव्हाण याला युवकाच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. त्याला दुचाकीवरुन आणून मारहाण करुन त्याचा मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणावरुन स्थानिक गुन्हे शाखेने चार संशयितांना यापूर्वी अटक केली होती. त्यांना पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती.
त्यांच्यासोबत असलेल्या तीन जणांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेवून भुईंज पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणात आणखी काही युवकांचा समावेश असल्याने पोलीस त्याचा तपास करत आहेत. तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अभिनंदन केले.