महापुराचा फटका : आतापर्यंत 115 हून अधिक जणांचा मृत्यू, काझीरंगा अभयारण्याचा बव्हंशी भाग पाण्याखाली
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये जवळपास 28 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या महापुरामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीके पाण्याखाली गेली आहेत. पूरस्थितीमुळे आतापर्यंत 52 हजार लोकांना निवारा छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी सातशे निवासी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून सोमवारी देण्यात आली. दरम्यान, पंतप्रधानांनी केंद्रीय पातळीवरून मदत पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱया काझिरंगालाही पुराच्या पाण्याचा फटका बसला असून अनेक प्राणी मृतावस्थेत सापडत आहेत. काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील दुर्मिळ स्वरुपाचे 8 गेंडे मृत्युमुखी पडल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. अभयारण्यातील 85 टक्के क्षेत्रात महापुराचा शिरकाव झाल्याने अनेक प्रणी दगावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. येथे एकशिंगी गेंडय़ांची दुर्मिळ प्रजाती आढळते. ही प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठय़ावर आहे. अशा परिस्थितीमध्ये आठ गेंडे मृत्युमुखी पडण्याची घटना धक्कादायक समजली जात आहे. दरम्यान, अभयारण्यातील इतर गेंडय़ांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आसाममध्ये मुसळधार पावसाने हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. तर विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यासाठी मदतकेंद्र उभी करण्यात आली आहेत. कोरोनाचा उद्रेक सुरू असताना महापुराचा फटका बसल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनल्याचे दिसून येत आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी राज्यात 100 बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय, राज्यातील 20 जिल्हय़ांमध्ये 700 मदतकेंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये सुमारे 60 हजार लोकांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
वन्यप्राण्यांची मोठी हानी
युनेस्कोने जागतिक संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही पुराचा जोरदार फटका बसला आहे. वन विभागाच्या अधिकाऱयांनी शंभरहून अधिक प्राण्यांना पुरातून सोडवले असून काही वाघ आणि गेंडे अजूनही पुरात अडकल्याचे सांगितले जात आहे. काही प्राणी पुरातून वाचण्यासाठी शेजारच्या गावातील मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे.