इचलकरंजी शहरासाठी ‘अमृत’ऐवजी आता ‘नगरोत्थान’मधून पाणी योजना
प्रतिनिधी / कोल्हापूर
इचलकरंजी शहराला दानोळीतून पाणी देण्यास होणारा विरोध आणि अमृत योजनेचा संपलेला कालावधी.. त्यामुळे वारणा योजना रद्द करून, ‘अमृत’ऐवजी नगरोत्थान योजनेतून इचलकरंजीला पाणी देण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरूवारी घेतला. कागल तालुक्यातील सुळकुडनजीक दुधगंगा नदीवर बंधारा बांधून त्यातून 1 टीएमसी पाणी इचलकरंजीला देण्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. तसेच यासंदर्भात 31 जुलैपर्यत जीवन प्राधिकरण विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
इचलकरंजीतील पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गुरूवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. पुण्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, मदन कारंडे, अजित जाधव, सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे, प्रशासन अधिकारी नितीन देसाई आदी सहभागी झाले.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पाण्याचा प्रश्न मांडला. सभापती विठ्ठल चोपडे यांनी सुळकुड योजनेची माहिती दिली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दानोळीतून शहराला पाणी देण्यास स्थानिक विरोध होत आहे. तसेच अमृत योजनेला वर्षभर मुदतवाढ दिली असली तरी तोपर्यत योजनेचा प्रस्ताव येणार नाही. त्यामुळे इचलकरंजीसाठी नगरोत्थान योजनेतून पाणी योजना करू. इचलकरंजी नगरपालिकेचे 25 टक्के आणि राज्य शासनाचा 75 टक्के वाटा यामध्ये असेल. त्यातही यापुर्वी 25 टक्के तरतूद केली आहे. आणखी 50 टक्क्यांची तरतूद करावी लागेल, ती राज्य सरकार करेल, असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कागल तालुक्यातील सुळकूड येथे दुधगंगा नदीत बंधारा बांधून तेथून इचलकरंजीला पाणी दिले जाईल. पण त्यात सुळकूडमधील लोकप्रतिनिधींची समजूत काढण्याची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांच्यावर राहील. मंत्री मुश्रीफ यांची जबाबदारी आपण स्वतः घेऊ. खासदार मंडलिक यांना समजून सांगण्याची जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. या दोघांना विश्वासात घेऊनच हा निर्णय होईल. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 31 जुलैपर्यत सर्वेक्षण करावे. पाणीपुरवठा विभागाने अंदाजपत्रकासह अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले.
नगर विकास विभागाचे सचिव महेश पाठारे म्हणाले, अमृत योजनेला वर्षभर मुदतवाढ मिळाली आहे. इचलकरंजीची पाणी योजना त्यातून मंजूर झाली आहे. पण काहीच काम झालेले नाही. त्यामुळे ही योजना नगरोत्थानमधून करावी, असे सुचित केले. त्यानुसार आर्थिक तरतूद करण्याची सुचना मंत्री पवार यांनी केली.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, दूधगंगा नदीतून कर्नाटकला आपण 4 टक्के पाणी देतो. याशिवार अडीच टक्के पाणी राखीव असते. त्यातील 1 टीएमसी पाणी आता इचलकरंजीला मिळणार आहे. कागल तालुक्यातील सुळकूड येथून 1300 मीटरवर दुधगंगा नदीत बंधारा घालून तेथून हे पाणी उचलले जाणार आहे. 31 जुलैपर्यत यासंदर्भातील सर्वेक्षण, अंदाजपत्रक पुर्ण होण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजीसाठी नगरोत्थान योजनेतून सुळकूडमधून पाणी देण्यास मान्यता दिली आहे. 31 जुलैपर्यत याचा अहवाल राज्य शासनाला सादर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ंमाजी आमदार हाळवणकर यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सर्वपक्षियांनी राजकारण बाजूला ठेवल्याने सुटल्याचे सांगितले.