मी शाळेत असताना मला नेहेमी प्रश्न पडायचा की इंग्लंड आणि जर्मनी आपापसात लढले, इग्लंडच्या बाजूने काही राष्ट्रे होती, जर्मनीच्या बाजूने काही राष्ट्रे होती. त्यांच्यामध्ये महायुद्ध सुरु होते, एवढी माणसे मारली गेली, कोणाचा अपमान झाला, तर हे सगळे मी भारतात का शिकत आहे? याचा उपयोग काय? त्यांच्यातल्या युद्धाची शास्त्रीय कारणे मला का विचारत आहेत? विशेष म्हणजे तेव्हाच्या इतिहासाच्या पुस्तकाची चित्रे नसायची. (आताही फार काही बदल झालेला नाही, ती पुस्तके तितकीच कंटाळवाणी आहेत). दुसऱया महायुद्धाच्या धडय़ामध्ये चित्र होते ते एका बोटीचे. त्या चित्रामधून धडय़ामधील मजकुराचा काहीही संदर्भ लागायचा नाही. त्यामुळे इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्राची पुस्तके वर्ष संपायला आले तरी नव्यासारखी दिसायची. याचे कारण ती पुस्तके कधी हातात घ्यावीशी वाटलीच नाहीत. आमचे भूगोलाचे शिक्षक गणिताचे रागीट होते त्यामुळे भूगोलाबद्दल मनात जी अढी-दहशत बसली ती शालेय जीवनात कधीही सुटली नाही. शाळेत कोणताही विषय आवडत नसेल तर त्याचे मूळ कारण विषयाव्यतिरिक्त वेगळेच असते. अशा तंग वातावरणात लोकशाहीचा अर्थ कधी समजलाच नाही. कारण शाळेत लोकशाही कधी अनुभवलीच नव्हती. त्यामुळे नागरिकशास्त्रात लोकशाहीची व्याख्या ‘लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेले सरकार’ म्हणजे नेमके काय हे समजलेच नाही. अशा विषयांची गोडी लागावी यासाठी काही करण्याची गरज आहे असे नेहेमीच वाटत आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, वर्षाचे नियोजन कसे करावे याबद्दल अनेक शाळांमध्ये एक तासाचा संवाद अनेक शाळांमध्ये साधला आहे. एका शाळेमध्ये हा संवाद संपल्यानंतर विद्यार्थ्यांना न आवडणारे विषय कोणते, असे प्रश्न विचारून त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले. त्यामध्ये एका विद्यार्थ्याने विचारले “सर, आम्हाला महायुद्ध शिकवणार का?’’ मी तत्परतेने होकार दिला आणि पुढील आठवडय़ात हा विषय शिकवण्यासाठी येईन असे आश्वासन दिले. एका राजपुत्राच्या खुनाची गोष्ट सांगून सुरुवात केल्यानंतर सर्वच विद्यार्थी कान टवकारून ऐकू लागले. त्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन देशांच्या टीम कशा झाल्या आणि त्यांना कोण-कशासाठी पाठिंबा देत होते, असे सांगितले. त्याला जोड म्हणून काही सैनिकांचे फोटो दाखवले. युद्धातील सैनिकांचे रोजचे अन्न काय होते, ते लांबचे अंतर कसे चालायचे, रणगाडे कशासाठी वापरतात हे सर्व सांगितल्यानंतर त्यांच्या डोळय़ासमोर युद्धाचे चित्र उभे राहिले. त्यानंतर यु टय़ूबवर उपलब्ध असलेली महायुद्धावरील एक फिल्म दहा मिनिटे दाखवली. त्यानंतर चार्ली चॅप्लीनच्या ‘ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटातील प्रसंग दाखवला. त्यानंतर इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ामधील दोन-तीन वाक्मये प्रत्येक विद्यार्थ्याकडून वाचून घेतली. परंतु विद्यार्थ्यांची निवड एका क्रमाने न करता कोणत्याही विद्यार्थ्याला पुढील दोन वाक्मये वाचण्यास सांगितली. त्यामुळे सर्व वर्गातील विद्यार्थी सजग राहिले आणि दृश्ये पाहिल्यामुळे धडय़ामध्ये काय लिहिले आहे, ते सहज समजून घेता आले. असा हा दीड तासाचा इतिहास वर्ग संपल्यानंतर मी बाहेर निघालो तेव्हा वर्गातील चार-पाच विद्यार्थी माझ्या मागोमाग बाहेर आले आणि मला म्हणाले, “सर, पुन्हा कधी येणार?’’. मी म्हणालो, “काय शिकवू?’’. एक विद्यार्थी म्हणाला, “काहीही शिकवा, पण पुन्हा या.’’
महत्वाचा मुद्दा हाच की इतिहास-भूगोल-राज्यशास्त्र यामध्ये विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण व्हावे यासाठी विद्यार्थी/नी पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
s विद्यार्थी/नी आणि पालक यांनी एकत्र येऊन आपल्या घरातील आई आणि वडील दोघांच्या आजी-आजोबा, पूर्वीच्या पिढीचा इतिहास तक्त्याच्या स्वरूपात मांडावा.
s कोणत्याही वस्तूचा इतिहास माहीत करून घेण्याचा प्रयत्न करावा. चहा- कॉफी- बटाटा- कॉम्प्युटर-जिराफ- जलपर्णी-हिमालय-मराठी भाषा-जोतिबा फुले-मुलींचे शिक्षण- स्त्रीयांना मतदानाचा हक्क-बटर चिकन-मिसळ अशा अनेक वस्तू- पदार्थ- घटना- व्यक्तींचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
s आपल्याला माहीत झाला तोच इतिहास नसतो. त्याला अनेक कांगोरे असतात. सर्वच कांगोरे आपल्याला माहीत नसतात. कोणीही कोणताही इतिहास तटस्थपणे सांगत आहे की त्याला जोडून आपली मते त्यामध्ये व्यक्त करीत आहे याचे तारतम्य बाळगायला विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर शिकावे.
s फक्त क्रमिक पुस्तकावर अवलंबून न राहता पालकांनी लायब्ररी सुरु करावी. प्रत्येक आठवडय़ाला एक पुस्तक बदलून आणावे आणि पुस्तक लायब्ररीमध्ये परत देण्यापूर्वी आपण पुस्तकात काय वाचले याबद्दल घरामध्ये सामूहिक चर्चा करावी. दरमहा किमान 200 रुपये पुस्तक खरेदीवर खर्च करावेत आणि विविध देशांची माहिती, प्रवास वर्णने, देशा-परदेशातील व्यक्तींची चरित्रे, भारतामधील वेगवेगळय़ा राज्यांमधील नायक अशा विविध विषयांवरील पुस्तके संग्रही ठेवावीत. एकाच विचारसरणीची पुस्तके न वाचता तोच प्रसंग/युद्ध वेगवेगळय़ा दृष्टीकोनातून समजून घेण्याबद्दल वाचन करून चर्चा करावी.
s भारत हा देश विविधतेने नटलेला आहे हे मुलांनी वाचलेले असते/ऐकलेले असते परंतु त्याचे प्रत्यंतर येण्यासाठी वर्षातून किमान एकदा आपल्या राज्याबाहेर सहल आयोजित करावी.
s शहरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शेती कशी करतात याबद्दल माहिती नसते. त्यामुळे एखादी ट्रीप शेतावर आयोजित करावी. कोणती पिके कशी लावतात, भात-लावणी, ज्वारी, हळद आणि इतर पिकांची लावणी यामध्ये फरक काय आहे हे विद्यार्थ्यांना पालकांनी समजावून सांगावे. भाताचे रोप लावण्यासाठी शेतामध्ये किती पाणी असावे लागते हे एकदा समजले की तांदूळ केरळमध्ये आणि गहू पंजाबमध्ये मुबलक प्रमाणात का पिकतो, हे सर्वांनाच समजेल.
s³ाgद्धे, महायुद्धे, विविध देशांची निर्मिती, त्यांच्या स्वातंत्र्याचा लढा असे अनेक जागतिक चित्रपट उपलब्ध आहेत. महिन्यातून किमान एकदा असे चित्रपट सहकुटुंब बघावेत आणि त्यावर चर्चा करावी. ‘भारत एक खोज’ ही दूरदर्शन मालिका आता यु टय़ूबवर उपलब्ध आहे. त्या मालिकेमध्ये ऐतिहासिक काळातील पोशाख, घरे अशा अनेक बारकाव्यांचा अभ्यास केला आहे, संवादातील भडकपणा टाळला आहे. त्यामुळे ही मालिका विद्यार्थ्यांनी पालकांसह बघावी आणि शिक्षकांनी शाळेत मुलाना दाखवावी.
s प्रत्येक राज्यामधील गड-किल्ले कोणते, लोकसंगीत कोणते, तिथली पारंपारिक वाद्ये कोणती, संगीत कोणते, नृत्य कोणते, अन्न-पोशाख यामध्ये फरक काय आहे, का आहे हे त्या राज्यामध्ये काही दिवस मुक्काम करून समजून घेण्यासारखे आहे. सर्वठिकाणी इतक्मया कमी वेळेत जाणे शक्मय नसल्यामुळे यु टय़ूबवरील माहितीपट घरातील सर्वांनी एकत्र येऊन बघावेत.
s घराच्या शेजाऱयांशी मैत्री/शत्रुत्व, वर्गातील मित्र/शत्रू अशा विषयांवर वर्गात चर्चा आयोजित करून मुलाना व्यक्त होऊ द्यावे आणि त्यानंतर भारताचे शेजारी या विषयावर विद्यार्थ्यांना चूक/बरोबर अशी कोणतीही मते व्यक्त करण्यास सांगावे आणि त्यानंतर वस्तुस्थिती तटस्थपणे विद्यार्थ्यांना सांगावी.
s इतिहास-भूगोल-राज्यशास्त्र यासारखे विषय फक्त वाचनामुळे समजणे अवघड जाते. त्यामुळे तो विषय समजण्यासाठी वृत्तपत्रे, चित्रपट, माहितीपट, चरित्रे, ऐतिहासिक पुस्तके अशा विविध आयुधांचा वापर शिक्षक आणि पालकांनी करावा.
s एकाच विषयावर वेगवेगळय़ा वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळी मते व्यक्त केलेले अग्रलेख विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगून त्याबद्दल मत व्यक्त करण्यास सांगितले तर त्यांना लोकशाहीचा अर्थ समजेल, विविध मतप्रवाह समजतील, त्यांचा आदर करण्याची भावना लक्षात येईल आणि भारतामधील वैविध्य म्हणजे काय याचे प्रत्यंतर वर्गामध्येच येईल.
निबंध स्वतःच्या शब्दात मांडणे वर्गातल्या प्रत्येकाला जमतेच असे नाही. एखादे चित्र दाखवले तर त्यामधील बारकावे सांगता येत नाहीत. त्यासाठी कोणती बुद्धिमत्ता आवश्यक असते, याबद्दल पुढील लेखामध्ये.
– सुहास किर्लोस्कर