प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठ परिसरातील प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आज आषाढी एकादशीचा उत्सव रद्द करण्यात आला. विठुरायाची विधिवत पूजा, काकडा आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात अजिबात गर्दी झाली नाही. यंदा विठ्ठलभक्तांनी घरामध्येच आषाढी साजरी केली. यंदा वारी नसल्यामुळे अनेकजणांना दुःख झाले, पण कोरोनाच्या संकटातून साऱयांना वाचव, अशी प्रार्थना आज एकादशीच्या निमित्ताने समस्त वारकऱयांनी केली.
विठ्ठल मंदिर देवस्थानने विठुरायाच्या पहिल्या पूजेचा मान राधाकृष्ण तथा बाबा कीर, सौ. शैला कीर या दांपत्याला दिला. कोविडचा फटका साऱया जगाला बसत आहे. गेल्या 24 मार्चपासून मंदिरेसुद्धा बंद आहेत. फक्त नित्यपूजा अर्चा सुरू आहे. मात्र भाविकांना दर्शनासाठी मंदिरे पूर्णपणे बंद ठेवली आहेत. कोरोनामुळे शासनाच्या आदेशानुसार यंदा आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार नसल्याचा फलक मंदिराच्या बाहेर लावण्यात आला होता.
दरवर्षी आषाढी एकादशीला या मंदिरात भाविकांची रीघ लागते. दिवसभर विविध ठिकाणच्या भजन मंडळांची भजने सुरू असतात. परटवणे येथून आषाढीनिमित्त पायी दिंडी येते. परंतु यंदा या सार्या उत्सवावर कोरोनामुळे विरजण पडले. भाविकांनी आषाढीनिमित्त घरीच राहावे, असे आवाहन विठ्ठल मंदिर देवस्थानने केले होते.
दरवर्षी रत्नागिरीतून पायी वारीला जाणार्या माउली ग्रुपचे सचिन काळे यांनी सांगितले की, गेली 20 वर्षे पायी वारीला जात आहोत. यंदा कोरोना (कोविड 19) लॉकडाऊनमुळे वारी रद्द झाली. त्यामुळे वारीला जाता येणार नाही म्हणून आमच्या ग्रुपमधील सर्वांना योगिनी एकादशीला हरिपाठ पारायण करणे सक्तीचे होते आणि सर्वांनी ते आनंदाने केले. रत्नागिरीतील सुमारे 200 हून अधिक वारकरी गेली अनेक वर्षे वारीला जात आहेत. हे वारकरी दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यावर वारीला जातात. तसेच फक्त पंढरपूरला जाऊन विठुमाउलींचे दर्शन घेणारे अनेक भाविक आहेत.