आणखी एका संसदसदस्याने काढला पाठिंबा
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्याच्या आव्हानाला तोंड देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या आणखी एका संसद सदस्याने पक्षांतर केले असून त्याने पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे संख्याबळ आणखी कमी झाले आहे. त्यांच्या सर्व मित्रपक्षांनीही पाठिंबा काढण्याचे संकेत दिल्याने बहुमत सिद्ध करणे त्यांना जड जाणार आहे.
गेल्या सोमवारी विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर येत्या गुरुवारपासून चर्चा होणार आहे. प्रस्तावावर 3 एप्रिलला मतदान होईल अशी शक्यता आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार इम्रान खान यांना बहुमतसाठी किमान 17 जागा कमी पडत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर त्यांनी काही मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला न वळविल्यास त्यांच्या सरकारचे पतन निश्चित आहे, असे मानले जाते. खान यांनी मात्र बहुमत सिद्ध करु, असा दावा केला असून एकंदर स्थिती दोलायमान असल्याचे दिसून येते.
लष्कराची ढवळाढवळ
पाकिस्तानी लष्कराचा एक मोठा गट इम्रानखानच्या विरोधात आहे. लष्कर प्रमुख जावेद कमर बाजवा यांनी लष्कर राजकीय वादात पडणार नाही अशी भूमिका घेतली असली तरी इम्रानखान यांच्या पक्षातून होणारे पक्षांतर लष्कराच्या पाठबळामुळेच होत आहे, असा आरोप होत आहे. पक्ष सोडणारा प्रत्येक संसद सदस्य प्रथम लष्कराच्या संपर्कात येतो. त्याला लष्कराकडून सूचना दिल्या जातात. त्यानंतर तो पक्षांतर करतो, अशी प्रक्रिया स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनीही याकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खान यांना लष्कराचाच छुपा विरोध असेल तर त्यांचे आसन वाचणे दुरापास्त आहे. त्यांची गच्छंती अटळ आहे, अशी भविष्यवाणी अनेक तज्ञांनी केली आहे.
कोंबडय़ा जिवंत जाळल्या
इम्रानखान यांच्या पत्नी बुशरा या जादूटोणा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी इम्रान सरकार वाचावे म्हणून कोंबडय़ा जिवंत जाळण्याचा अघोरी उपाय चालविला आहे, अशी माहिती पाकिस्तानातील वृत्तपत्रांमधून आणि प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहे. या संबंधातील काही व्हिडीओही प्रसिद्ध झाले आहेत. या क्रूर कृत्याचा सर्वत्र निषेध होत असून पाकिस्तानातूनही विरोधी सूर उमटत आहेत. बुशरा या त्यांचा जादूटोणा आणि अघोरी प्रयोगांसाठी अनेकदा वादग्रस्त ठरल्या आहेत.