वायु हल्ल्यात 96 अतिरेक्यांचा मृत्यू, काही नेतेही ठार
तेल अविव / वृत्तसंस्था
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या आठवडाभर चाललेला संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. गुरूवारी व शुक्रवारी इस्रायलने गाझा पट्टीत आतपर्यंत वायू हल्ले चढविले. 44 वेळ संशयित इमारतींवर बाँबफेक करण्यात आली. यात 24 हून अधिक इमारती कोसळल्या. या इमारतींमधून हमास या दहशतवादी संघटनाची कार्यालये चालतात असा इस्रायलचा आरोप होता. या वायूहल्ल्यांमध्ये साधारणतः हमासचे 96 हस्तक ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
इस्रायलने गाझापट्टी या पॅलेस्टाईच्या भागाच्या आसपास मोठय़ा प्रमाणात सैन्य आणून ठेवले आहे. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, अशी स्थिती आहे. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात 119 पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झाले असा दावा हमासने केला आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
पॅलेस्टाईनींची पळापळ
गेल्या बुधवारी पॅलेस्टाईनने इस्रायलवर 600 क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला केला. मात्र लोहकवच (आयर्न डोम) तंत्रज्ञानामुळे या हल्ल्याचा किरकोळ परिणाम झाला. इस्रायलचे 5 नागरीक ठार झाले. मात्र, त्याचा बदला म्हणून इस्रायलने सातत्याने गाझा आणि आसपाच्या भागांमध्ये वायुहल्ले चालविले आहेत. आता पॅलेस्टाईनी नागरीकांचा धीर सुटत चालला असून त्यांची पळापळ सुरू झाली आहे. दाटीवाटीच्या वस्तीचा भाग सोडून ते वाळवंटाकडे जात आहेत.
भारतीय महिलेचा मृतदेह सोपविला
दोन दिवसांपूर्वी भारताची एक महिला सौम्या यांचा पॅलेस्टाईनी क्षेपणास्त्रांमुळे मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह इस्रायलने तेल अवीव येथे भारतीय दूतावासाला सोपविला आहे. आता तो भारतात आणण्याची तयारी सुरू करण्यात आली असून शनिवारी संध्याकाळपर्यंत तो भारतात येईल अशी शक्यता आहे. सौम्या या मूळच्या केरळमधील होत्या. त्या इस्रायलमध्ये परिचारिकेचे काम करीत होत्या.