प्रतिनिधी / बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसी करणे बंधनकारक केल्याने आधारकार्ड दुरुस्तीसाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे कर्नाटक वन कार्यालयात आधारकार्ड दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रेशनकार्ड दुकानदारांनी ई-केवायसीच्या कामाला प्रारंभ केल्याने आधारकार्डची मागणी वाढली आहे. आधारकार्डमधील नावात बदल करणे, पत्त्यात बदल करणे, जन्म तारीख व मोबाईल क्रमांकात बदल करणे यासाठी नागरिकांची कार्यालयात वर्दळ वाढली आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. मात्र, बऱयाच जणांच्या आधारकार्डमध्ये चुका असल्याने त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे. शहरातील अशोकनगर, गोवावेस, टीव्ही सेंटर व रिसालदार गल्ली येथील कार्यालयातून आधारकार्ड दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र केवळ रिसालदार गल्ली येथील कार्यालयात नागरिक गर्दी करीत आहेत. इतरत्र ठिकाणी असलेल्या कार्यालयांतूनही आधारकार्डसंबंधित कामे करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
कर्नाटक वन कार्यालयात आधारकार्डबरोबर वीज बिल, दूरध्वनी बिल, घरपट्टी, पाणीपट्टी भरून घेण्याचे काम चालते. रिसालदार गल्लीत असलेल्या कार्यालयात कर्मचाऱयांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामासाठी नागरिकांना तासन्तास थांबावे लागत आहे. त्यामुळे शहरातील इतर ठिकाणी कर्नाटक वन कार्यालयातून रेशनकार्ड व इतर कामे करून घ्यावीत, असे सांगण्यात येत आहे.