सज्जन शिंदे / बेंबळे
राज्यात सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेले उजनी गावच्या उजाड माळरानावर साकारलेले एक स्वप्न म्हणजे उजनी धरण. 27 सप्टेंबर 1980 तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी धरणाचे लोकार्पण केले. आज याला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाय आज जागतिक पर्यावरण दिन आहे. सिंचन, औद्योगिक विकास, पिण्याचे पाणी, हरितक्रांतीसाठी वरदान ठरलेले धरण आज देश-विदेशातील पक्ष्यांसाठी नंदनवनच ठरत आहे.
निर्मितीनंतर 1981 पासून धरणात पाणी साठवण्यास प्रारंभ झाला. उजनी धरण परिसराची प्राकृतिक व भौगोलिक परिस्थिती पक्षी जीवनास अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षी वैविध्यची परंपरा लाभली आहे. प्रत्येक वषी हिवाळ्याच्या प्रारंभी शेकडो प्रकारचे पक्षी स्थलांतर करून उजनी पाणलोट क्षेत्रात येऊन थडकतात. युरोप, उत्तर अमेरिकासह अंटार्टिका प्रदेश, रशिया, मंगोलिया, कझाकिस्तान, सायबेरिया येथून हजारो मैल अंतर पार करून बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी उजनी धरण परिसरात गर्दी करतात. पट्टकंदब हंस, कदंब हंस, परी बदक, चक्रवाक, बाड्डा बदक व विविध हंस पक्षी, स्थलांतरित करून आलेले हिवाळी पाहुणे पक्षी उष्णतेच्या ४० अंशाच्या पाऱयाचा अनुभव घेऊन पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मूळस्थानी मार्गस्थ होतात.
युरोप व अमेरिका खंडात होणाऱया हिमवृष्टीमुळे या पक्ष्यांना भूक भागविणे कष्टप्राय होते. हिमालयाच्या पलीकडील मंगोलिया, रशिया, सायबेरिया, अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक राष्ट्रांमध्ये हिवाळ्यात कडाक्मयाच्या थंडीमुळे पक्ष्यांच्या शरीर क्रियेत कमालीचा बदल होतो आणि याच काळात भारतात विशेष करून महाराष्ट्रात या पक्ष्यांना अनुकूल वातावरण तयार होते. उजनी धरणातील पाणी उन्हाळ्यात कमी होत असल्याने कीटक, मासे, मृदुकाय प्राणी, बेडकाची पिल्ले आदी खाद्यान्न विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काही पक्षी तर आपल्या वंश वाढीसाठीसुध्दा परदेशातून इकडे वाऱया करतात.
ही आहेत आगमनाची कारणे
विपुल पाणी, मुबलक खाद्यान्न, लपण्यासाठी व विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उजनी परिसरात आहे. विविध जाती, अनेक प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी पाहण्याचे एकमेव ठिकाण उजनी धरण असल्याने पक्षी प्रेमी, पक्षी अभ्यासकांना उजनी धरण नंदनवनच आहे.