17 तासांपर्यंत घराबाहेर पडून होता मृतदेह : 48 तास उलटल्यावर शवविच्छेदन, बेजबाबदार पोलीस
वृत्तसंस्था / बदायूं
उत्तरप्रदेशच्या बदायूं जिल्हय़ात मंदिरात पूजेसाठी गेलेल्या एका महिलेवर क्रौर्याचा कळस गाठण्यात आला आहे. मंदिराच्या महंतासह तीन जणांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार करत तिच्या शरीरात लोखंडी सळी घुसवून जीवघेण्या यातना दिल्या आहेत. एवढेच नाही, तर महिलेचा मृतदेह फेकतानाही क्रौर्याची परिसीमा गाठण्यात आली आहे. या क्रौर्यानंतर पोलिसांच्या बेजबाबदारपणाने कळस गाठला आहे. महिलेचा मृतदेह घराबाहेर 17 तासांपेक्षा अधिक वेळ पडून राहिला होता. ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाल्यावर पोलीस जागे झाले आहेत.
3 जानेवारी रोजी संध्याकाळी 50 वर्षीय अंगणवाडी सहाय्यिका मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. यादरम्यान मंदिरात उपस्थित महंत सत्यनारायण, वेदराम आणि चालक जसपाल यांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्याच दिवशी रात्री आरोपींनी स्वतःच्या वाहनातून महिलेचा मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून पलायन केले होते.
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी उघैती पोलीस स्थानकाला पूर्ण घटनेची माहिती दिली, परंतु पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. सर्वप्रथम पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा दावा खोटा असल्याचे म्हणत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याची भूमिका घेतली होती. कुटुंबीयांनी वारंवार दाद मागूनही पोलिसांनी एफआयआरही नोंदविला नव्हता.
महिलेचा मृतदेह तिच्या घराबाहेर 17 तासांपेक्षा अधिक वेळ पडून होता. संतापाचा उद्रेक झाल्यावर ग्रामस्थांनी हा मृतदेह पोलीस स्थानकात आणला. ग्रामस्थांचा संताप अनुभवल्यावर तसेच वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांचा हा बेजबाबदारपणा येथेच संपलेला नाही. 4 जानेवारी रोजी गुन्हा नोंद केल्यावरही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करविण्यात आली नाही. शवविच्छेदन 5 जानेवारी रोजी झाले, तोपर्यंत घटनेला 48 तासांपेक्षा अधिक वेळ उलटला होता.
दोन आरोपी फरार
पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. बेजबाबदार पोलीस स्थानक प्रमुख राघवेंद्र प्रताप यांना निलंबित करण्यात आले आहे. तर 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
आदित्यनाथ सरकार लक्ष्य
प्रियंका वड्रा यांनी बदायूं सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केले आहे. महिला सुरक्षेप्रकरणी राज्य सरकारच्या वृत्तीतच काळंबेरं आहे. हाथरसमध्ये शासकीय यंत्रणेने प्रारंभी पीडितांचे म्हणणेच ऐकून घेतले नाही. सरकारने अधिकाऱयांना वाचवून आवाज दडपला. बदायूं येथे पोलीस स्थानक प्रमुखाने फिर्यादींना दूर लोटून घटनास्थळाची पाहणीही करणे टाळले असल्याची टीका प्रियांका यांच्याकडून करण्यात आली आहे.
कायदा-सुव्यवस्था अपयशी
योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात धार्मिक स्थळेही सुरक्षित नाहीत. बदायूं येथील महिलेसोबत झालेले क्रौर्य ऐकून थरकाप उडतो. उत्तरप्रदेशातील गुन्हे रोखण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात लक्ष देण्याऐवजी योगी आदित्यनाथ आंतरराष्ट्रीय नेते होऊ पाहत असल्याचा आरोप आम आदमीचे पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी केला आहे.