वृत्तसंस्था/ गाझीपूर
उत्तरप्रदेशच्या 24 जिल्हय़ांना महापूराचा तडाखा बसला असून 600 गावांमध्ये अनेक जण बेघर झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱयांना आपत्ती निवारणासंबंधी महत्त्वाच्या सूचना केल्या.
पूरग्रस्त भागांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधे पाठवावीत. विशेषतः सर्पदंशांवरील औषधांचा साठा योग्य प्रमाणात ठेवावा, पूरग्रस्त भागात धनुर्वात, रॅबीज आणि अन्य काही सांसर्गजन्य विकार पसरू नयेत यासाठी दक्षता घ्यावी. गुरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि पुरात सापडलेल्या लोकांना सातत्याने अन्न पुरवठा करावा, अशा सूचना त्यांनी पूरग्रस्त जिल्हय़ांतील अधिकाऱयांना केल्या.
गाझीपूर, बलिया आणि अन्य दोन जिल्हय़ांना पुराचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या जिल्हय़ांवर आपण व्यक्तिशः लक्ष ठेवले असून दर दोन तासांनी आपत्ती निवारणाची ताजी माहिती घेत आहोत. प्रशासनाने वेळीच पावले उचलल्याने मोठी हानी टळली आहे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नमूद केले.