अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुुक्रवार 8 ऑक्टोबर, सकाळी 09.15
● मास्क, सोशल डिस्टन्सिंगला बगल
● प्रशासनाकडून वारंवार आवाहन
● 24 तासात 164 रूग्ण वाढले
● 7 हजार 811 संशयितांच्या चाचण्या
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रूग्णवाढ 150 ते 200 पर्यंत स्थिर आहे. मृत्यूदरही घटला आहे. सातारा, फलटण, कराड या तालुक्यात रूग्णवाढ कमी-जास्त होत आहे. या पार्श्वभुमीवर आता नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. उत्सव काळात कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान आहे. कारण अनेक सार्वजनिक ठिकाणी नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसून येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखत बिनधास्त होण्यापेक्षा भविष्यातील धास्ती टाळण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. दरम्यान प्रशासनाने तिसरी लाट येऊ नये यासाठी लसीकरणाची कवचकुंडल मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 164 रूग्ण वाढले असून 7 हजार 811 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
रूग्णवाढ स्थिर…चाचण्याही घटल्या
सप्टेंबर महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरल्यानंतर आक्टोंबर महिन्यातही रूग्णवाढीची स्थिती स्थिर आहे. आक्टोंबरच्या आठ दिवसात दोन दिवस पॉझिटिव्हीटी 3 टक्केच्या वर गेल्याने चिंता वाढली. मात्र, पुन्हा सलग दोन दिवसात पॉझिटिव्हीटी रेट वेगाने घसरला. रूग्णवाढही दोनशेच्या खाली घसरली असून चाचण्यांची संख्याही घटली आहे.
गणेशोत्सवात संयम दाखवल्याने स्थिती नियंंत्रणात
गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करत जिल्हावासियांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. कारण गणेशोत्सव साजरा होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. आता नवरात्र उत्सव कालपासून सुरू झाला आहे. नवरात्र उत्सवातही नियमांचे पालन करण्याचे आव्हान जिल्हावासियांसमोर आहे. हे आव्हान पेलत जिल्हावासियांनी पुन्हा एकदा संयम आणि जबाबदारी दाखवल्यास गणेशोत्सव, नवरात्र उत्सवासह दिवाळीचे फटाकेही कोरोनाच्या भयमुक्त वातावरणात फुटतील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोरोनामुक्तीही वाढली
जिल्ह्यातील रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 286 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. बाधितांपेक्षा डिस्चार्जमध्ये वाढ झाली आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 164
एकूण मुक्त- 286
एकूण बळी- 04
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने- 2124351
एकूण बाधित -249716
घरी सोडलेले -240691
मृत्यू -6333
उपचारार्थ – 5395