सहावी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना मुभा
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील सर्व सहावी ते दहावीपर्यंतच्या शाळा पूर्ण क्षमतेने भरविण्याचा आदेश शिक्षण खात्याने दिला आहे. त्यामुळे सोमवार दि. 4 ऑक्टोबरपासून शाळा पूर्णवेळ म्हणजेच सकाळी 10 ते सायंकाळी 4ः30 या वेळेत भरणार आहेत. तथापि, मध्यान्ह आहार सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांना घरातूनच जेवणाचा डबा आणि पिण्यासाठी पाणी आणावे लागणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना वर्गातील हजेरीची सक्ती असणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्स आणि आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीनुसार 23 ऑगस्टपासून कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यापेक्षा कमी असणाऱया जिल्हय़ांमधील नववी आणि दहावीचे तसेच 6 सप्टेंबरपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. तर 25 सप्टेंबर रोजी ऑक्टोबरपासून पूर्ण प्रमाणात शाळा भरविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक शिक्षण खात्याने यासंबंधीची मार्गसूची जारी केली असून 4 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना दिली आहे.
याआधी प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 1ः30 या वेळेत भरविण्यात मुभा देण्यात आली होती. तर माध्यमिक शाळांमधील नववी आणि दहावीचे वर्ग सकाळी 10 ते दुपारी 1ः30 या वेळेत आणि आठवीचा वर्ग दुपारच्या सत्रात 2 ते सायंकाळी 4ः40 पर्यंत भरविण्यात येत होते. आता हे सर्व वर्ग दिवसभर म्हणजेच पूर्ण शालेय कालावधीत भरविता येणार आहेत. परंतु, कोणत्याही विद्यार्थ्याला हजेरी सक्तीची करता येणार नसल्याचे आदेशपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
आवश्यकतेनुसार शाळांनी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्याआधी त्यांची थर्मल स्क्रिनिंग, हॅण्ड सॅनिटायझर, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी सुरक्षा मार्गसूचीचे पालन करणे अनिवार्य आहे. शाळेत कोरोना प्रकरण आढळून आल्यास शाळा काही दिवसांकरिता बंद ठेवावी. स्थानिक आरोग्य अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सूचविलेल्या दिवसापासून शाळा पुन्हा सुरू करावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.