ऑनलाईन टीम/तरुण भारत
ओबीसी आरक्षणाबाबत (obc reservation) येत्या २५ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार आहे. जर न्यायालयाने वेळ वाढवून दिली तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. अन्यथा तात्काळ निवडणुका जाहीर होतील. पण अगदी उद्या जरी निवडणुका (election) झाल्या तरी भाजप बहुमताने जिंकेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी पूर्ण झाली आहे. विजय खेचून आणण्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारने ओबोसी आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढू पणा केला. त्याचमुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही हा न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबुन आहे. ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. पण अगदी उद्या जरी निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पार्टी बहुमताने जिंकून येईल. त्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नाही. भाजपाच राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येणार असल्याचा विश्वास माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारला ओबीसींचे आरक्षण न्यायालयात टिकविता आले नाही. ओबीसींच्या भल्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पूर्ण सहकार्य केले. आम्ही बहुमताने कायदा पारित करवून घेतला. पण राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडणे अपेक्षित होते. ते त्यांना जमले नाही. केवळ सरकारच्या दुर्लक्षपणामुळे ओबीसींच्या आरक्षणात अडचणी निर्माण झाल्या. त्याचवेळी राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले असते तर राज्यात होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असता असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.