उसगांव येथील नागरिकांची वीज कार्यालयावर धडक
वार्ताहर/ उसगांव
उसगांव भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱया खंडित वीजपुरवठय़ामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी वीज खात्याच्या तिस्क येथील कार्यालयाला भेट देऊन जाब विचारला.
यावेळी सहाय्यक अभियंते नितीन प्रभू व कनिष्ठ अभियंते गौरेश सावईकर यांनी त्यांना भेडसावीत असलेल्या तांत्रिक अडचणी, अपुरा कर्मचारीवर्ग, नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज, जुन्या जर्जर झालेल्या वीज वाहिन्या व इतर समस्यांची जाणीव वीज ग्राहकांना करून दिली.
वीज सुधारणेसाठी 5 कोटींची गरज
उसगांव भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी 5 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पण त्याच्या मान्यतेसाठी सरकार दरबारी निर्णय घेणे आवश्यक आहे. येथील वीज वाहिन्या जर्जर झाल्याने वारंवार तुटत आहेत. पाच नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे.
अभियंत्यांची व कर्मचाऱयांची नितांत गरज
तिस्क उसगांव येथे वीज खात्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात पूर्वी दोन कनिष्ठ अभियंते व कर्मचारी मिळून दिवस व रात्रपाळी विभागून काम करायचे. पण डिसेंबर 2019 मध्ये एका कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली व अजून पर्यंत दुसऱया अभियंत्याची नियुक्ती याठिकाणी करण्यात आलेली नाही. कामगारांचाही तुटवडा आहे. उसगांव पंचायत क्षेत्र, धारबांदोडा पंचायत भाग व कुर्टी खांडेपार पंचायतीचा काही भाग या कार्यालयाच्या कक्षेत येतो. बोंडला, गांजे, नाणूस, ताक, तिराळ, सोनारबाग, बाराजण, कातर, म्हारवासडा, पार-पारसोळ, धाटवाडा, तिस्क, कसयले, अवंतीनगर, धावशिरे, धारबांदोडा पंचायत व कुर्टी खांडेपार पंचायत असा मोठा भाग असून सहाय्यक अभियंते नितीन प्रभू, कनिष्ठ अभियंते गौरेश सावईकर व वीज खात्याचे कर्मचारी आपल्यापरीने अखंडीत वीज सेवा देण्यास प्रयत्नरत असतात.
उसगांवात वीज समस्या गंभीर
साहाय्यक अभियंते नितीन प्रभू यांनी सांगितले की उसगावातील वीज समस्या गंभीर बनली आहे. जर्जर वीज वाहिन्या, जंगल भागातून जाणाऱया वीज वाहिन्या, वाहिन्यावर पडणारी झाडे, अपुरा कर्मचारी वर्ग व नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज अशा विविध समस्या असून फोंडा तालुक्यातील अन्य भागापेक्षा उसगावातील वीज समस्या गंभीर आहे.
वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करूö प्रभू
सहाय्यक अभियंते नितीन प्रभू यांनी सांगितले की, उसगावातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. येत्या आठवडय़ात ठराविक भागात तीन वेळा खंडित वीज पुरवठा करून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण समस्या कायमची मिटण्यासाठी पाच कोटीच्या अंदाज पत्रकास मंजूरी मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.