दुसऱया दिवशी सुमारे अडीचशे शेतकऱयांचा सहभाग
प्रतिनिधी/ सांगे
ऊस उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी शनिवारपासून सांगे मामलेदार कार्यालयाजवळ आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाच्या दुसऱया दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे अडीचशे शेतकरी दुसऱया दिवशी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. शनिवारप्रमाणे रविवारीही सहभागी महिला शेतकऱयांची संख्या लक्षणीय होती. उपमुख्यमंत्री व सरकार मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आंदोलक बाळगून आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखविले. या धरणे आंदोलनात शेतकरी आपला पक्ष विसरून सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी बऱयाच आंदोलकांनी धरण्याच्या स्थळीच रात्रीचा मुक्काम ठोकला. सांगेतील काही नागरिकांनी त्यांच्यासाठी चादरी, जमखान इत्यादीची सोय केली. सकाळी कुणी नाष्ता आणून दिला. रविवार असूनही सहभागी आंदोलकांची संख्या बरीच होती. महिलांनी दुपारचे जेवण आंदोलनाच्या स्थळीच तयार केले. रविवारचा मेनू भात, तारल्याचे हुमण व तळलेले बांगडे असा राहिला.
आमदार, काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा
सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी रविवारी आपली उपस्थिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू व मळकर्णेचे पंच संदेश गावकर हजर होते. काँग्रेसचे संकल्प आमोणकर, किसान विभागाचे अध्यक्ष अभिजित देसाई, हर्षद गावस देसाई, पुष्कल सावंत देसाई, नेत्रावळी पंचायतीचे पंच प्रकाश भगत यांनी उपस्थिती लावून शेतकऱयांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही शेतकऱयांच्या बरोबर असून अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱयांचे प्रश्न लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी केली. आपण स्वतः शेतकरी असून ऊस उत्पादक जगला पाहिजे. या मागण्या रास्त असून त्या पूर्ण होणे गरजेचे आहे, असे मत हर्षद गावस देसाई यांनी व्यक्त केले.
फळदेसाईंकडून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेचे निमंत्रण
संध्याकाळी माजी आमदार सुभाष फळदेसाई व रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी ऊस उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱयांना निमंत्रित केले. पण आंदोलक त्यास तयार झाले नाहीत.
उपमुख्यमंत्री कवळेकरांची पुन्हा चर्चा
कृषिखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दुसऱया दिवशी सांगे येथे एका कार्यक्रमाला आले असता पुन्हा आंदोलकांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी सविस्तर विषय समजून घेतला. सरकारने आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱयांना जी आश्वासने दिली आहेत ती पाळली आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले. यावषी उभ्या ऊसाला प्रति टन रु. 3000 नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे आंदोलकानी सांगितले.
ऊस मळय़ात राहिल्याने समस्या
गतवषी सरकारने ऊस गोव्याबाहेरील कारखान्याला पाठविला होता. पण यंदा ऊस मळय़ात आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाल्याचे शेतकऱयांनी सांगितले. ऊस उत्पादक संघटनेने शेतकऱयांचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकऱयांनी यावेळी केला. कवळेकर आल्यानंतर माजी आमदार फळदेसाई व जि. पं. सदस्य केपेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी आंदोलकांनी कवळेकर यांना मुख्यमंत्र्यांशी बोलून या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली. मंत्र्यांनी शांतपणे शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी मंत्र्यांनी आंदोलकांना सामंजस्याची भूमिका घेऊन तडजोड करण्याची विनंती केली. कवळेकर यांच्यासोबत मेश्यू डिकॉस्ता हेही हजर होते. आंदोलनाच्या स्थळी विरंगुळा म्हणून काहींनी गाणी व कविता सादर केल्या.