या जगामध्ये अनेक प्रकारच्या क्रांतिकारी घटना घडल्या, त्याची नोंद इतिहासामध्ये झाली आहे. पण अशी एक आध्यात्मिक क्रांती एकोणिसाव्या शतकात घडली त्याची फारशी कल्पना अजूनही जगाला नाही. 13 ऑगस्ट 1965 रोजी सकाळी 9 वाजता एका मालवाहू बोटीतून एक 69 वर्षांचे वयोवृद्ध संन्यासी केवळ 40 रुपये आणि भागवत ग्रंथाच्या काही प्रती घेऊन भगवतगीतेमधील कृष्णभक्तीचा संदेश संपूर्ण जगाला देण्यासाठी अमेरिकेस जाण्यासाठी निघाले. पुढील 12 वर्षात संपूर्ण जगभरात प्रवास करून त्यांनी 108 श्रीकृष्णमंदिराची स्थापना केली. भगवत गीता, श्रीमद भागवत, चैतन्य चरितामृत, इषोपनिषद, भक्तिरसामृतसिंधु इत्यादी 80 ग्रंथांचे लिखाण केले आणि आपल्या शिष्यांच्या मदतीने सर्व जगभर करोडोच्या संख्येने त्यांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करून वितरण केले. वैदिक ग्रंथाच्या वितरणाचा हा एक जागतिक विक्रम आहे आणि अजूनही कार्यरत आहे. त्याचप्रमाणे हजारो शिष्यांना कृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जीवन समर्पित करण्यासाठी प्रेरणा दिली. अशी आध्यात्मिक क्रांती या जगाच्या इतिहासात घडविणाऱया त्या नम्र संन्याशाचे नाव आहे श्रीकृष्णकृपामूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. जगाच्या इतिहासामध्ये भारतातून कृष्णभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमेरिकेला जाणारे ते पहिले वैष्णव संन्यासी आहेत.
जवळ जवळ 525 वर्षांपूर्वी श्रीचैतन्य महाप्रभूनी भविष्यवाणी केली होती की सर्व जगामध्ये श्रीकृष्णभक्तीचा प्रचार व प्रसार होईल. 13 ऑगस्ट 1965 या दिवसापर्यंत ही केवळ एक भविष्यवाणीच राहिली होती. पण ही भविष्यवाणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपले गुरुमहाराजांच्या आदेशानुसार श्रील प्रभुपाद यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या 12 वर्षांमध्ये कठोर परिश्रम केले आणि जगामध्ये एक आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. निश्चितच हा प्रवास अतिशय खडतर आणि कष्टप्रद होता पण जगाच्या कल्याणासाठी स्वेच्छेने ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
श्रील प्रभुपाद यांचा जन्म कलकत्ता येथे 1 सप्टेंबर 1896 रोजी एका वैष्णव कुटुंबात झाला. त्यांचे नाव अभयचरण ठेवले गेले. लहानपणापासूनच कृष्णभक्तीचे ज्ञान आणि शिक्षण त्यांनी आपले वडील गौर मोहन डे यांच्याकडून प्राप्त केले. तरुणपणी त्या काळातील परिस्थितीनुसार त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्येही सहभाग घेतला होता. सन 1922 साली एके दिवशी आपल्या मित्राच्या आग्रहाखातर अभयचरण गौडीय मठातील भक्तीसिद्धान्त सरस्वती या त्या काळातील थोर संन्यासी याना भेटावयास गेले. त्यांच्यासमोर येताच त्यांनी सन्मानपूर्वक दंडवत केला. अभयचरण याना पाहून भक्तीसिद्धान्त सरस्वती म्हणाले ‘तू एक सुशिक्षित युवक आहेस. चैतन्य महाप्रभूंच्या कृष्णभक्तीच्या संदेशाचा तू जगभर प्रचार का करीत नाहीस?’ अभयचरणला हा आदेश ऐकून आश्चर्यच वाटले. पण त्या थोर संन्याशाच्या शब्दाचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. पुढे तो आदेश त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले. त्यानंतर 1932 साली नोव्हेंबर महिन्यात त्यांनी रीतसर दीक्षा घेतली. काही वर्षे गृहस्थाश्रमाचे पालन करत व्यवसायही केला. पण आपल्या गुरुंचा आदेश ते कधीच विसरले नाहीत. त्यानंतर आपल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून वयाच्या 58 व्या वषी ते कृष्णलीलांचे स्थान असलेल्या मथुरा वृन्दावनात आले. तेथे राहून त्यांनी वैदिक शास्त्रांचा गाढ अभ्यास केला. त्याचबरोबर प्रचारासाठी अनेक प्रयत्नही त्या काळात केले. त्यानंतर त्यांनी 17 सप्टेंबर 1959 ला संन्यास आश्रम स्वीकारला. त्यांचे संन्यास आश्रमातील नाव होते अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी.
त्यानंतर त्यांनी आपले प्रचारकार्य जोमाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. प्रचारासाठी भगवद्गीता व भागवतवर आधारित मासिक व पुस्तकांचे प्रकाशनही सुरू केले. अत्यंत खडतर परिस्थितीत कोणाचेही सहकार्य नसताना त्यांनी हे कार्य एकटय़ाने सुरू केले. त्यांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे भगवद्गीता आणि भागवत ग्रंथातील ज्ञान समाजामध्ये वास्तविकपणे शांती, समाधान व एकोपा आणू शकते. हे पटवून देण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटी घेणे व त्यांच्याशी चर्चा करून त्यांची प्रचारकार्यासाठी मदत मिळविण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळचे उपराष्ट्रपती झाकीर हुसेन आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही त्यांनी भेट घेतली पण सहानुभूती आणि थोडासा त्यांच्या ग्रंथांचा आणि प्रचारकार्याचा गौरव यापलीकडे त्यांना काहीही प्राप्त झाले नाही.
त्यांच्या प्रचारकार्यास म्हणावा तितका प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता, पण त्यामुळे निराश न होता व खचून न जाता त्यांनी आपल्या गुरुमहाराजांचा श्रीकृष्णभक्तीचा प्रचार करण्याचा आदेश प्रामाणिकपणे आणि निश्चयपूर्वक चालूच ठेवला. पण त्याचवेळी त्यांनी जाणले की आपले आता वय होत चालले आहे. प्रचारासाठी त्यांनी आता अमेरिकेला जाण्याचे ठरवले. कारण त्यांनी जाणले की भारतीय लोक आपल्या वैदिक संस्कृतीला विसरून अमेरिका युरोपसारख्या पाश्च्यात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत आहेत. त्यांच्या गुरुमहाराजांच्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये प्रचार करण्याच्या आदेशाचेही त्यांना वारंवार स्मरण होत होते. पण त्या आदेशाचे पालन करण्याकरिता त्यांच्याकडे कोणत्याही सुविधा नव्हत्या, पैसा नव्हता, कोणतीही मदत नव्हती. पण आपल्या प्रयत्नात त्यांनी कोठेही कमतरता पडू दिली नाही. जिथे जातील तेथे ते आपल्या ध्येयपूर्तीबद्दल बोलत असत. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे येण्याचा विचार केला. तेथेही त्यांच्या काही ओळखी होत्या. त्यामध्ये एक होत्या सुमती मोरारजी, ज्या सिंधिया स्टीमशिप कंपनीच्या मालकीण होत्या. भक्तिवेदांत स्वामींनी विचार केला की त्यांच्याकडे विमानाने अमेरिकेला जाण्यासाठी पैसा नाही पण सुमती मोरारजींच्या कंपनीची मालवाहतूक करणारी जहाजे अमेरिकेला जात असतात. त्यांना एकदा विचारून पहावे. त्यांचा विश्वास, निश्चय आणि तळमळ पाहून सुमती मोरारजींनी त्यांच्या जलदूत नामक मालवाहतूक जहाजातून अमेरिकेसाठी प्रवास करण्यासाठी मान्यता दिली. त्यांना एका कोपऱयातल्या खोलीत जागा देण्यात आली होती. प्रवासामध्ये अनेक शारीरिक अडचणींना त्यांना सामना करावा लागला, तीन वेळा हृदयविकाराचे झटकेही आले. 37 दिवसांच्या प्रवासानंतर त्यांनी अमेरिकेत पदार्पण केले. तिथेही एकटेच, त्या अनोळखी देशात अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला. हे सर्व कशासाठी तर गीताभागवत ग्रंथानुसार श्रीकृष्णभक्तीचा प्रचार जगाच्या कल्याणासाठी करण्यासाठी. त्यामुळे जगाच्या इतिहासातील आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात करणारा हा श्रील प्रभुपाद यांच्या करुणेच्या प्रवासाचा दिवस म्हणून जगाच्या इतिहासात नोंद केला जाईल.
– वृंदावनदास