केंद्र सरकारकडून समिती नियुक्त : सदस्यांमध्ये एमएस धोनी, आनंद महिंद्रा यांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्समध्ये (एनसीसी) व्यापक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या काळानुसार एलसीसीला अधिक समर्पक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार एनसीसीच्या सध्याच्या प्रणालीमध्ये बदल आणि सुधारणा सुचवण्यासाठी माजी खासदार वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोणी, खासदार विनय सहस्रबुद्धे आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही पंधरा सदस्यीय समिती एनसीसीच्या कामकाजाचा अधिक समर्पक आणि उपयुक्त बनवण्यासाठी व्यापक आढावा घेईल आणि सुधारणेसाठी आवश्यक सूचना करणार आहे. या समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे संरक्षण मंत्रालय पुढील रणनीती ठरवणार आहे. एनसीसी ही संस्था विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मूलभूत लष्करी प्रशिक्षण देते. एनसीसीचा उगम जर्मनीमध्ये झाला. तर भारतीय संरक्षण कायदा 1917 अंतर्गत भारतात 16 जुलै 1948 रोजी त्याची स्थापना झाली. युवकांना सैन्याशी संबंधित प्राथमिक शिक्षण देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. एनसीसीअंतर्गत विद्यार्थ्यांना सैनिकांच्या शैलीचे प्रशिक्षण दिले जाते. लष्कराप्रमाणेच ते लष्कर, हवाई दल आणि नौदलामध्ये विभागले गेले आहे. एनसीसीमध्ये सामील होणाऱया तरुणांना कॅडेट म्हणतात.