एपीएमसी अध्यक्ष, सदस्यांना दुकानदारांनी सभागृहातच कोंडले : गैरमार्गाने सुरू केलेले नवीन भाजी मार्केट बंद करण्याची मागणी
वार्ताहर / अगसगे
अलीकडेच एपीएमसीचे सर्व नियम धाब्यावर बसवून गांधीनगरजवळ नवीन भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एपीएमसी येथील भाजी मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे एपीएमसीमधील भाजी मार्केटमधील दुकानदार आक्रमक झाले आहेत. एपीएमसीमध्ये गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत याचे पडसाद उमटले. एक तर गैरमार्गाने सुरू केलेले भाजी मार्केट बंद करा किंवा एपीएमसीमध्ये दुकाने घेण्यासाठी भरलेली रक्कम परत करा, अशी मागणी करत दुकानदारांनी ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा घेतला. तसेच यावेळी एपीएमसी अध्यक्षांसह सेक्रेटरी व सदस्यांना सभागृहात कोंडून ठेवले. त्यामुळे एपीएमसीतील वातावरण चांगलेच तापले आहे.
शासनातर्फे बेळगाव एपीएमसीमध्ये भाजी मार्केटसाठी सुमारे 80 कोटी खर्च करून दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. काही दुकान गाळय़ांचे काम सुरू आहे. दि. 14 मे 2019 मध्ये एपीएमसीमध्ये भाजी मार्केट सुरू करण्यात आले. यावेळी अनेकांनी 18 लाख ते 1 कोटीपर्यंत प्रत्येकी दुकान गाळय़ाला रक्कम मोजून खरेदी केली आहे. आता कुठे व्यापाऱयांचा जम बसला होता व खरेदी-विक्री जोरात सुरू होती. असे असताना दि. 3 जानेवारी 2022 रोजी खासगी भाजी मार्केट सुरू झाले. त्यामुळे एपीएमसीतील भाजी मार्केटमधील व्यापारावर परिणाम झाला आहे.
‘त्या’ भाजी मार्केटचा परवाना रद्द करा
गुरुवारी एपीएमसीची मासिक बैठक होती. याची कुणकुण भाजी मार्केटमधील व्यापाऱयांना लागली होती. त्यामुळे त्यांनी शामियाना उभारून ठिय्या आंदोलन छेडले. ठिय्या आंदोलनाची माहिती एपीएमसी प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे पोलीस फौजफाटा मागवून बैठकीला सुरुवात करण्यात आली. बैठक सुरू असतानाच दुकानदारांनी सभागृहात प्रवेश केला व त्यांना जाब विचारला. एक तर गांधीनगरजवळील भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्याचा ठराव करा, अन्यथा दुकान गाळय़ांसाठी भरलेली रक्कम परत करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एपीएमसी सेक्रेटरी व अन्य अधिकाऱयांनी खासगी भाजी मार्केटसाठी परवानगी देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपही करण्यात आला. एपीएमसी सदस्य व अध्यक्षांनी लाच घेतलेल्या अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. भाजी मार्केट व्यापारी व एपीएमसी सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण चांगलेच पेटणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार भाजी मार्केटमधील दुकानमालकांनी केला आहे.
सदर मासिक बैठकीला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. भाजी मार्केटमधील व्यापाऱयांनी सकाळी 11 वाजता आपल्या मागण्या मांडण्यासाठी सभागृहात प्रवेश केला. एपीएमसी अध्यक्ष, सदस्य आणि अधिकाऱयांबरोबर व्यापाऱयांची गांधीनगर येथे सुरू झालेल्या भाजी मार्केटच्या परवान्यासंदर्भात जोरदार चर्चा होऊन शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दुकानदारांनी एपीएमसी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत दुपारी 12 वाजता एपीएमसीच्या पदाधिकाऱयांना व अधिकाऱयांना सभागृहात कोंडून ठेवले. याची माहिती मिळताच एपीएमसीचे पोलीस अधिकारी फौजफाटय़ासह दाखल झाले. दुकानदारांनी एपीएमसी कार्यालयासमोर मंडप उभारून न्याय मिळेपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलन सुरू ठेवले.
सेक्रेटरी डॉ. के. कोडीगौडा आणि एपीएमसीचे राज्य डायरेक्टर करीगौडा यांच्यावर लाच, भ्रष्टाचाराचा आरोप भाजी मार्केटमधील दुकानदारांनी केला. यावेळी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी, व्यापारी गजानन शहापूरकर, बसनगौडा पाटील, सदानंद पाटील, सतीश पाटील, जिया हंचिनमनी, असिफ कलमनी, सुरेश पुजारी, जावेद सनदी, लक्ष्मण चौगुले, शट्टू लंगोटी, मारुती कुट्रे, नितीन मुतगेकर, सुनील कांबळे, सदा पाटील, संजय सन्नी आदी व्यापारी उपस्थित होते.
वादावादी…
- पोलीस फौजफाटा मागवून बैठकीला सुरुवात
- ‘त्या’ भाजी मार्केटच्या परवान्यासंदर्भात जोरदार चर्चा
- अधिकाऱयांनी परवानगी देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप
त्या’भाजी मार्केटला जिल्हाधिकारी-प्रशासनाची परवानगी
एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम
बैठकीत भाजी मार्केट व्यापाऱयांनी जाब विचारताच एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम यांनी जय किसान भाजी मार्केटसाठी आम्ही एपीएमसीमध्ये ठराव केलेला नाही. सदर नवीन भाजी मार्केटमुळे एपीएमसीला सुमारे अडीच लाख रुपये महिन्याला नुकसान होत आहे. जय किसान भाजी मार्केटला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे एपीएमसीला तोटा सहन करावा लागत आहे.