प्रतिनिधी / सातारा :
राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासुन संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी ची चाके आगारातच ठप्प झाली आहेत. जवळपास चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग दर्शविला आहे, यामुळे एकुण साडेसातशे गाडय़ा जागेवर उभ्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 आगारातून दररोज बसेसच्या 1 हजार 263 फेऱ्या होतात. त्यातुन एक लाख 52 हजार 588 किलोमीटर अंतराचा प्रवास करून प्रवाशांना सेवा देण्यात येते. याअंतर्गत 46 लाख 29 हजाराचे उत्पन्न मिळते. त्यातच दिवाळी सणानिमित्त आणखी जादा बसेसची सोय ही करण्यात आली होती. पण सर्वच फेऱ्या संपामुळे बंद झाल्या होत्या. त्यामुळे मागील 3 दिवसात दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यातील एस.टी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग दर्शविल्याने राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.