डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी, मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
कातरखटाव डांबेवाडी गावचे रहिवाशी मनोज निकाळजे (वय 43) यांना धाप लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. शनिवारी दुपारनंतर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने पेंशट व नातेवाईकांनी ऑक्सिजन देण्याची मागणी केली. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ऑक्सिजनची व्यवस्था वेळेवर न केल्याने बाधिताचा मृत्यू झाल्याचा आरोप बाधिताचे नातेवाईक शैलेश खरात यांनी मीडियाशी बोलताना केला.
शैलेश खरात यांनी सांगितले की, जिल्हा शासकीय रूग्णालयात दोन दिवसांपूर्वी मनोज निकाळजे (वय 43) यांना धाप लागत असल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केले होते. दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होता. तोच शनिवारी दुपारी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी मनोज निकाळजे व त्यांच्या नातेवाईकांनी उपचार करत असलेल्या डॉक्टरांना यांची कल्पना दिली. मात्र डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष करत योग्य तो उपचार केला नाही. यामुळे पेंशटचा मृत्यू झाला आहे. याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारणा केली असता ऑक्सिजन उपलब्ध नाही. तसेच स्टाफ कमी असल्याने आम्ही काही करू शकत नाही असे उत्तर दिले.