मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजावर सातत्याने अन्यायच केला असून ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा दोन्ही काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला.
हंसराज अहिर यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. मोदी सरकार तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी अन्य मागासवर्गीय समाजाच्या हिताचे, कल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी प्रवर्गाच्या 27 मंत्र्यांना स्थान दिले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय सुरू केले. मोदी सरकारने अन्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनातून अन्य मागासवर्गीय समाजाला लाभ मिळालेले आहेत. त्यामुळेच हा समाज भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, असं अहिर म्हणाले.
काँग्रेसने ओबीसी समाजावर आजवर सातत्याने अन्यायच केला. काँग्रेस सत्तेत असताना काका कालेलकर, मंडल आयोगाचे अहवाल दडपून ठेऊन ओबीसी समाजाचे भले होऊ दिले नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने केली, याकडे अहिर यांनी लक्ष वेधले.
आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर 15 महिन्याच्या कालावधीत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना हे आरक्षण टिकवण्यासाठी वटहुकुम काढला. हा वटहुकुम कायद्यात परावर्तीत करण्याची जबाबदारी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडी सरकारवर होती. मात्र आघाडी सरकारने यासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आघाडी सरकारने वारंवार तारखा मागितल्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डेटा मुदतीत सादर न केल्यामुळे न्यायालयाने हे आरक्षणच रद्द करून टाकले. आपला नाकर्तेपणा सर्वोच्च न्यायालयात उघडा पडल्याने आघाडी सरकारमधील ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी मोदी सरकारवर खापर फोडणे चालू केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Trending
- “भावी मुख्यमंत्री… नाना पटोले”; भंडाऱ्यात झळकले बॅनर
- यंदा नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा
- कोल्हापूर क्षेत्रातही आणखीन विमानतळ विकसित करणार : ज्योतिरादित्य सिंधीया
- ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात मविआ एकत्र राहणार नाही : प्रकाश आंबेडकर
- राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद अधिकृतच : शरद पवार
- ओडिशा अपघातात जवळपास 300 ठार
- शैक्षणिक वर्ष उद्यापासून सुरू
- अल्कारेझ, सोनेगो, स्वायटेक, चौथ्या फेरीत