कारवाईमुळे वाहनधारक-पोलिसांत वादाचे प्रसंग
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरात गेले दोन दिवस गर्दी कमी होण्याचे अद्याप नावच घेत नाही. बुधवारी शहरात ग्राहकांची मोठी गर्दी झाल्यानंतर गुरुवारीही बाजारपेठेत वर्दळ होती. एकिकडे लॉकडाऊन असताना पोलीस यंत्रणेवर गर्दी रोखण्याचे आव्हान असताना लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने पोलीस यंत्रणेवरील हा ताण वाढताना दिसत आहे. यावेळी वाहनांवर होणाऱया कारवाईमुळे वाहनधारक व पोलिसांत वाद होत होते.
बुधवारी रात्री कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी येथील पटवर्धन चौकात विनाकारण फिरणाऱया वाहन चालकांवर वाहने जप्तीची कारवाई केली. यावेळी येथे किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. दुचाकीवर एकच व्यक्ती व चारचाकीत चालक व अन्य दोन व्यक्ती अशी परवानगी असताना या नियमाचा भंग करणाऱयांवरही बुधवारी रात्री कारवाई करण्यात आली. एका महसूल कर्मचाऱयाने कामावरून घरी परतत असताना दुचाकीवर डबलसीट घेतल्याने त्याच्यावरही कारवाईसाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्या कर्मचाऱयात व पोलिसांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्या कर्मचाऱयाची दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली. वरिष्ठांच्या फोन नंतर त्या कर्मचाऱयावर कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. बीएसएनएलमधील एका कर्मचाऱयाच्या चारचाकीत तीनपेक्षा जास्त व्यक्ती असल्याने त्याच्यावरही कारवाईचा इशारा देण्यात आला. बराचवेळ याबाबत त्या कर्मचाऱयाची व पोलिसांची चर्चा सुरू होती. मात्र, त्या कर्मचाऱयावरही कारवाई झाली नसल्याचे समजते.
दरम्यान, दारू दुकाने उघडण्याबाबत शासनाने सशर्थ परवानगी दिल्यानंतर बुधवारी रात्री कणकवलीतील एक देशी दारूचे दुकान उघडणार असल्याची माहिती मिळताच त्या दुकानासमोर मद्यपींची गर्दी झाली होती. अनेकजण काळोखात थांबून दुकान उघडण्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, उशिरापर्यंत दुकान न उघडल्याने अनेक मद्यपींच्या आशेवर पाणी फिरले.