प्रतिनिधी/करमाळा
आईला सतत त्रास देणाऱया व घरात भांडण करणाऱया वडिलांचा दोन सख्ख्या भावांनी गळफास देऊन खून करून अंत्यसंस्कार केले आहेत. हा प्रकार 7 एप्रिलला वरकुटे (मुर्तीचे), ता. करमाळा येथे रात्री साडेदहा वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक श्रीकांत शहाजी हराळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की 13 एप्रिलला सायंकाळी आठ वाजता पोलीस स्टेशनला असताना एका खाजगी व्यक्ती मार्फत वरकुटे येथे मुलांनी वडीलांचा खुन केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी स्वत: व पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार आम्ही वरकुटे येथे जाऊन माहिती घेतली असता, भैरू भागवत जगताप (वय-55, रा. वरकुटे) याचा मृत्यू होऊन 8 एप्रिलला पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे समजले. त्यानंतर भैरू जगताप याचा मोठा मुलगा निखिल याला चौकशीसाठी बोलाविले परंतु त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर त्याची सविस्तर चौकशी केली असताना, त्याने सांगितले, की माझे वडील आरदांड होते. आईला सतत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करायचे. आम्हालाही शिव्या देऊन दमदाटी करायचे. माझे लग्न 16 फेब्रुवारी 2021 रोजी झाले. त्या लग्नाला माझ्या मामाला बोलायचे नाही अशी धमकी दिली होती. परंतु माझा भाऊ अक्षय याने मामाला बोलविले होते. त्याच राग माझ्या वडीलांना होता. 7 एप्रिलला सायंकाळी साडेदहा वाजता आम्ही सर्व घरात झोपलो असताना, माझ्या आईचा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी मी व माझा भाऊ तेथे गेलो असता, वडील तुझा भाऊ लग्नाला कसा आला. असे म्हणून मारहाण करत होते. आम्ही सोडवायचा प्रयत्न केला असता, त्या दोघांना आवरत नव्हते. त्यानंतर माझी आई अविणा व पत्नी प्रियंका या शेजाऱयांना बोलविण्यासाठी गेल्या. त्यानंतर मी व माझ्या भावाने वडिलांचा काटा काढायचा असे ठरवून अगोदर वडिलांचे दोरीने पाय बांधले. त्यानंतर दुसऱया दोरीने वडिलांचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर वडिलांना बाहेर ओढीत आणून त्यांनी गळफास घेतला असे दृश्य निर्माण केले व लोक आल्यानंतर आम्ही रडलो तर पहाटे अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानुसार दोघा भावांनी वडिलांचा संगनमताने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलीसांनी भैरू भागवत जगताप याच्या खून प्रकरणावरून त्याची मुले निखिल जगताप व अक्षय जगताप या दोघा भावांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव हे करत आहे.