कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे महे- बीड पूल पाण्याखाली तर सावरवाडी व शिरोली दुमाला दरम्यान पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे. गेली अनेक दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. पण सोमवारपासून पाऊस सुरू झाल्यामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत आहे.
करवीर तालुक्यामध्ये महे- बीड पुलावर पाणी आल्यामुळे पुढील दहा-बारा गावाला जाणारा मार्ग बंद झालेला आहे. गेली अनेक वर्ष बारा वाड्याला जोडला जाणारा हा मार्ग महापुरात बंद होतो, पण यावर्षी प्रथमच दोन दिवसाच्या पावसाने हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सावरवाडी- शिरोली दरम्यान ओढ्यावर पाणी आल्याने ओढ्यावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत कोणीही प्रवास करू नये , असे पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. हिरवडे, सावर्डे दुमाला या गावातील जाणाऱ्या प्रवाशांना हळदी मार्गे प्रवास सोयीस्कर होईल, असे आपत्ती निवारण- पोलीस पाटील यांच्यामार्फत सूचना दिल्या आहेत.
पुलाचे पाणी वाढू लागल्याने गेल्या वर्षी आलेल्या महापुराचा आठवणी ताजा होऊ लागल्या आहेत. यावर्षी दोन दिवसात पंचगंगेचे पाण्याची पातळी जवळपास 34% पर्यंत पोहोचली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. तरी नदीकाठच्या गावाने सावध राहण्याचा इशारा जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात येत आहे.