भाजप सरकारने आधी चीन, पाकिस्तानची घुसखोरी रोखावी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी सिमा भागात येवून दाखविण्याचे केलेले आव्हान रविवारी शिवसेनेचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्विकारत वेळ व तारीख सांगा असे खुले आव्हान दिले. तसेच सिमा आंदोलनासाठी जाणाऱयांना रोखणाऱ्या भाजप सरकारने आधी चीन व पाकिस्तानची घुसखोरी रोखावी असा टोलाही मंत्री सामंत यांनी लगावला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्कमंत्रीपदी निवड झाल्यानंतर रविवारी ते कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आदि उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे बालिश आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी महाराष्ट्रासमोर शहाणपण करु नये. स्वतःचे उपमुख्यमंत्रीपद व राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी त्यांनी केलेला हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला आव्हान देवू नका, तुम्ही वेळ तारीख आणि दिवस सांगा त्या दिवशी आम्ही कर्नाटकात हजर राहू असे खुले आव्हानही मंत्री सामंत यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिमा प्रश्नामध्ये लक्ष घालून आहेत. या ठिकाणची सर्व माहिती ते घेत आहेत. न्यायालयीन लढाईसाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. बेळगांव हा महाराष्ट्राचाच भाग आहे, यामुळे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये कर्नाटक सरकारने ज्या बेळगांवी असे फलक उभे केले आहेत ते लवकरच हटविण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.