बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात वाढत्या कोरोना संख्येवर बोलताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सीमा कडक करण्याची आणि सक्तीने कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यांनतर दिल्लीच्या पहिल्या दौर्यावर गेलेल्या बोम्माई यांनीही राज्य सरकार सध्याच्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा आणखी मजबूत करेल, असेही ते म्हणाले.
कर्नाटकात वाढत्या कोविड प्रकरणांबद्दल बोम्माई म्हणाले की त्यांनी या संदर्भात दक्षिण कन्नड, चामराजनगर, म्हैसूर आणि कोडगूच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांना कडक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बोम्माई यांनी “आम्हाला आमच्या सीमा कडक कराव्या लागतील. आम्हाला अनिवार्य चाचणी आणि लसीकरण करावे लागेल,” असे ते म्हणाले. दिल्ली भेटीनंतर बोम्माई यांनी दक्षिणा कन्नड, चामराजनगर, म्हैसूर आणि कोडगू, तसेच चिकमंगळूर आणि उडुपी यांच्या जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी “आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखणे हे त्यांचे प्राधान्य आहे,” असे ते पुढे म्हणाले.