ऑनलाईन टीम / श्रीनगर :
मागील 14 महिन्यांपासून स्थानबद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची मंगळवारी रात्री कैदेतून सुटका करण्यात आली. कैदेतून सुटका झाल्यानंतर त्यांनी लगेचच जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेले कलम 370 परत मिळवायचं आहे, असा इशारा मोदी सरकारला दिला आहे.
5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून या दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मोदी सरकारने दिला. त्यापूर्वी एक दिवस आगोदर मेहबुबा मुफ्ती यांच्यासह काही नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. मुफ्ती यांच्या मुलीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मुफ्ती यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या अंधाऱ्या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, चौदा महिने नजरकैदेत ठेवून माझी सुटका करण्यात आली आहे. दिल्लीने हिरावून घेतलेले कलम 370 नेहमीच माझ्या मनावर घाव घालत राहिले. जम्मू-काश्मीरमधील लोकांनाही याचा त्रास झाला असेल. आता निर्धार करून दिल्लीने हिरावलेले कलम 370 परत मिळवावे लागेल.