एस. के. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कोर्लेकर यांची माहिती
कणकवली / प्रतिनिधी:
कोकणात परिवर्तन साहित्याला गती देणारे ज्येष्ठ कवी आ. सो. शेवरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्याच कोर्ले गावातील ‘एस. के. फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. सदर पुरस्कार पुणे येथील कवी देवा झिंजाड यांच्या हार्मिन्स प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सर्व उलथवून टाकलं पाहिजे’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात शेवरे यांच्या पत्नी मायावती शेवरे व शालिनी कृष्णा कोर्लेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती एस. के. फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कोर्लेकर यांनी दिली.
कवी शेवरे यांनी ऐंशीच्या दशकापासून तळकोकणात परिवर्तन साहित्य चळवळीला प्रारंभ केला. त्यांच्या पहिल्याच ‘गांधारीची फुले’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याचे लक्ष वेधून घेतले. या संग्रहाला त्याकाळी अ. भा. साहित्य संमेलनातर्फे देण्यात येणारा कविवर्य बा. सी. मर्ढेकर पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यानंतर निघालेल्या त्यांच्या दोन संग्रहानेही जाणकार रसिकांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे चाळीस वर्षे विद्रोही साहित्य चळवळीत कार्यरत राहताना गटातटापासून दूर राहून निष्ठेने त्यांनी काव्यलेखन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवर्तन विचार मांडणाऱ्या सर्व स्तरातील कवीना सोबत घेऊन त्यांनी विविध उपक्रम राबविले. ‘प्रसंवाद’ वाड:मयीन नियतकालिकाची निर्मिती केली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे कोर्ले गावाचेही नाव सर्वदूर पोहोचले. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्ले गावातील एस. के. फाउंडेशनतर्फे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे श्री कोर्लेकर यांनी सांगितले.
प्रा.सोमनाथ कदम, कवी मधुकर मातोंडकर, कवी राजेश कदम, अच्युत देसाई सर आदींच्या परीक्षक समितीने आ. सो.शेवरे काव्य पुरस्कारासाठी कवी झिंजाड यांच्या ‘सर्व उलथवून टाकले पाहिजे’ या काव्यसंग्रहाची निवड केली आहे. या संग्रहात झिंजाड यांनी तुटत चालणाऱ्या जगण्याचे, त्याच्या संघर्षाचे अनुभव प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहेत. अनुभवाचे विविध पदर उलगडत जाणारी ही कविता अनुभवचा सच्चा धागा विणत शब्दाच्या गोफणी मधून नेमक्या ठिकाणी वार करते. या कवितेतील प्रखर सामाजिक भान आणि विद्रोह थक्क करणारा असून हे भानच वाचकाला आजच अरिष्ट सगळ उलथवून टाकण्याची प्रेरणा देते. क्रांती केल्याशिवाय नवे बदल काही शक्य नाही असे आवाहन करणारी ही कविता एका सात्विक उद्रेकातून निर्माण झाली असल्याने तिचा आ. सो.शेवरे काव्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला असल्याचे या पुरस्काराच्या परीक्षक समितीने म्हटले आहे.